प्राथमिक शिक्षक परिषदेतर्फे गुणवंत शिक्षक, शाळांचा गौरव
अलिबाग, ( धनंजय कवठेकर ) : आज इंटरनेटच्या युगात पालक त्यांच्या कामात गुंतलेले आहेत. अशावेळी शिक्षकांवरील जबाबदारीचे ओझे वाढले आहे. पुढच्या काळात ते आणखी वाढणार आहे. नवी पिढी घडवण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांनी आता अधिक जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे (प्राथमिक) संस्थापक आमदार संजय केळकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक) रायगड शाखेच्या वतीने जिल्हयातील आदर्श शिक्षक आणि शाळा यांचा गौरव करण्यात आला. पेण येथील रविराज फार्म येथे पार पडलेल्या या सोहळयात प्रमुख अतिथी म्हणून आ. केळकर बोलत होते. शिक्षण हिताकडे लक्ष देणारया आदर्श शिक्षकांची आज समाजाला गरज आहे. शिक्षकांच्या हिताचे प्रश्न सोडवण्याकडे आम्ही लक्ष घालू. शिक्षकांच्या मुख्यालयाचा प्रश्न जवळजवळ सुटलेला आहे तो लवकरच मार्गी लागेल असे आ. केळकर यांनी सांगितले. आमदार केळकर यांनी शिक्षक परिषदेच्या कामाचे कौतुक केले परिषदेने शिक्षकांचे अनेक प्रश्न हाती घेवून धसास लावले. या कामाचा एक अहवाल तयार करून तो प्रसिद्ध करावा, अशी सूचना त्यांनी केली.
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांना शासनाकडून मिळणारा निधी खूपच अपुरा आहे. इथल्या लोकप्रतिनिधींनी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. अशी मागणी परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर नैतिक मूल्यांची अधिक प्रमाणात रुजवून करणे काळाची गरज आहे. जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची जिल्ह्या प्रशासनाकडून सोडवणूक न झाल्यास जिल्हा परिषद शिक्षण विभागा समोर आंदोलन करणार असल्याचा इशारा सुर्वे यांनी यावेळी दिला.
रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ॲड. नीलिमा पाटील यांनीदेखील परिषदेच्या कामाचे कौतुक करताना शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक ते सर्व करण्याचे आश्वासन दिले. मात्र कमी पटाच्या शाळा बंद करण्याच्या धोरणामुळे ग्रामीण, दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील अशी भीती व्यक्त करून हे धोरण राबवू नये अशी सूचना केली. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मिळणारे शिक्षण दर्जेदार असते असं त्या म्हणाल्या. शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष उदय गायकवाड यांनी प्रास्ताविक करताना परिषदेच्या कामगिरीचा थोडक्यात आढावा घेतला. तसेच हे आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यामागचा हेतू स्पष्ट केला.
या कार्यक्रमात १५ गुणवंत शिक्षक, १६ गुणवंत शिक्षिका आणि १४ शाळांचा आदर्श पुरस्काराने सन्मान करण्यात आला. परिषदेच्या रायगड शाखेच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्य नेते संजय निजापकर, नरेंद्र गुरव, भाजपचे युवानेते वैकुंठ पाटील, पेण पतपेढीचे माजी अध्यक्ष ल. शं. जंगम, राज्य प्रसिदधी प्रमुख वैभव कांबळे, कमल केळकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.