टीबी मुक्त ग्रामपंचायतीत ६७ ग्रामपंचायतींना रौप्य पदक

 



जागतिक क्षयरोग दिन आणि टीबी मुक्त ग्रामपंचायत गौरव सोहळा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न


नांदेड  : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त २४ मार्च रोजी वर्षभरात, निकषाच्या आधारावर टीबी मुक्त ग्रामपंचायत करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या १६ तालुक्यातील २४८ पैकी ६७ ग्रामपंचायती रौप्य पदक स्मृतीचिन्हास पात्र ठरल्या आहेत. या ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते महात्मा गांधी स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. 


यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ) मंजुषा कापसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हिरानी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ  बुट्टे, अर्धापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या झिने , जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बदीउद्दीन, जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार डॉ. सम्यक खैरे यांची उपस्थिती होती. 




या ग्रामपंचायती मागील वर्षीही ब्राँझ स्मृती चिन्हाने गौरविल्या गेल्या होत्या. मागच्या वर्षातील ८६ ग्रामपंचायतीपैकी ६७ ग्रामपंचायती पुन्हा टीबी मुक्त ठरल्याने या ग्रामपंचायतींना सिल्वर स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.


जनसामान्यांमध्ये क्षयरोगाविषयी जनजागृती करून , क्षयरुग्ण शोधून यांना नियमित औषधोपचार देत लवकरात लवकर क्षयमुक्त करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी केले. यानंतर अप्पर जिल्हाधिकारी राम बोरगावकर यांनी क्षयरुग्णांनी नियमित औषधोपचार घेऊन रोगमुक्त व्हावे, असे आवाहन केले. यासोबतच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड आदींची समयोचित भाषणे झाली. 





Post a Comment

Previous Post Next Post