दिवा : दिवा शहरातील सिद्दीविनायक गेट जवळील जलवाहीन्या जुन्या झाल्या असल्याने त्यांचे व्हॉल्व्हही नादुरुस्त झाले आहेत. तेथे लिकेज झाल्याने त्यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. एकीकडे दिव्यात भीषण पाणीटंचाई सुरु असताना दुसरीकडे मात्र पाण्याचे महत्त्व जाणणारी संवेदनशील मंडळी या पाण्याचा अपव्यय पाहून हळहळ व्यक्त करीत आहेत.
यातीलच काहीजण मग वाया जाणारे पाणी रोखण्यासाठी विविध उपाय करतात. कोणी पाणी गळतीच्या ठिकाणी गोणी बांधते, तर कोणी प्लास्टिकच्या बाटल्या लावून ठेवते.ठाणे महापालिकेकडून मात्र या पाणी गळतीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही.
दिव्यातील पाणीटंचाई सर्वश्रुत आहे. मुख्य जलवाहीन्यांच्या दुरुस्तीमुळे ठाणे महानगरपालिकेकडून अलर्ट जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे मागील शनिवार, रविवार नागरिकांना पाणी पाणी करावे लागले होते. अनेकांनी टॅंकद्वारे पाणी मागविले होते. त्यामुळे येथील नागरिकांना आर्थिक फटका बसला होता. दुरुस्तीनंतर सध्या कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाणी टंचाई सर्वच ठिकाणी जाणवू लागली आहे, असे असताना मात्र सिद्धीविनायय गेट जवळील जलवाहीन्यांतून पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत असल्याचा विडीओ व्हायरल होत आहे.
येथील जलवाहिनी बदलण्याचे काम मागील ६- ७ वर्षांपासून सुरुच आहे. या पार्श्वभूमीवर शहरातून जाणाऱ्या जलवाहिन्यांवरील बहुतांश व्हॉल्व्ह गंजल्यामुळे वा अन्य काही कारणाने नादुरुस्त झाले आहेत. त्यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. हे पाणी रोखण्यासाठी व्हॉल्व्ह दुरुस्ती करणे गरजेची आहे. पण त्याकडे मनपा पुरेशा गांभीर्याने लक्ष देत नाही. परिणामी लाखो लिटर पाणी वाया जात आहे. ज्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे ते मात्र हळहळ व्यक्त करीत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

