डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेत विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांचे संमेलन भरविण्यात आले. संमेलनाचे हे २७ वर्षे असल्याचे संस्थापक विवेक पंडित सरांनी सांगितले. महाराष्ट्र -आणि इतरही राज्यांच्या काना-कोपऱ्यातून आलेल्या आजी-आजोबांचे शाळेत गुलाबाचे फूल देऊन आणि मुलांच्या लेझीम पथकाच्या झंजावातात व तुतारी वाजवून स्वागत केले.
थंडीत शाल घेऊन शाळा पाहणे, शिवाजी महाराजांना कुर्निसात करून, नातवंडांचे कलागुण पाहून, शाळेतील कला शिक्षकांनी केलेली अनोखी कल्पकता पाहून, त्याच्या बरोबर सेल्फी काढून स्थानापन्न व्हायचं! घरी सहजी न मिळणारं पक्वान्न अचानक हातात, म्हणजे कांद्याची गरमागरम भजी व वाफाळलेला चहा! आनंदाने त्याचा आस्वाद घेता घेता, नातवंडांचे सांस्कृतिक कार्यक्रम, त्यांच्या काळातील नाट्यपदे आणि विद्यार्थ्यांनी केलेले खुमासदार निवेदन ऐकता ऐकता ही मंडळी देहभान विसरले.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या-नातवंडांच्या आवाजात सुंदर गाणी, त्यावर आजी-आजोबांनी ताल धरत केलेले नृत्य नंतर आजी-आजोबांचे भन्नाट खेळ, आजींची धमाल उखाणे स्पर्धा, शाळेतील शिक्षिका, तमाम हौशी आजींना मेंदी काढण्यात आला. दरवर्षी त्यांच्या काळातील, एका सेलिब्रेटीला बोलावून अनोखे मनोरंजन केले जाते. एकदा तर दाजीशास्त्री पणशीकर स्वतः आजोबा म्हणून आले होते. त्यांनी स्टेजवर येऊन ' धंदा न झालेली शाळा ' असे गौरवोद्गार काढले.आतापर्यंत विजया जोगळेकर धुमाळे व विनय धुमाळे, श्रीधर फडके, शरद पोंक्षे, अमर ओक, अशोक पत्की,सुधीर गाडगीळ हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून आले होते.



