जे.एम.एफ. ऑल इंडिया शिष्यवृत्ती प्रदान सोहळा संपन्न

 



दिवा, (आरती मुळीक परब) : नेहमीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने कार्यरत असलेली जेएमएफ शिक्षण संस्था गेली तीन वर्षापासून 'जे एम एफ शिष्यवृत्ती' ही शाळा व महाविद्यालय विद्यार्थांना देत आहे. केवळ डोंबिवलीतील विद्यार्थी नाही तर संपूर्ण भारतातून विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते. दरवर्षी शिष्यवृत्तीसाठी एक परीक्षा घेण्यात येते व त्या निकालातून उत्कृष्ठ पाहिले तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना 'जे एम एफ शिष्यवृत्ती' देण्यात येते.


जे एम एफ संस्थेचे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोख रक्कम व पदक देऊन शिष्यवृत्ती योजना आखली. मुंबईबरोबरच नागपूर जिल्ह्यातील दावसा या गावी देखील जन गण मन कॉन्व्हेन्ट स्कूलमध्ये देखील हजारो विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षा स्पर्धेसाठी बसले होते. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने देखील बऱ्याच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या.


कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे त्याचबरोबर प्राचार्य आमोद वैद्य, प्राचार्या श्यामला राव, उपप्राचार्या तेजावती कोटीयन, ज्योती व्यंकट रामन, समन्वयक ममता राय यांनी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.  उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून प्रथम आलेल्या रोमी शो - इ. तिसरी या विद्यार्थिनीला रोख रक्कम, सुवर्णपदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले तर अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवलेल्या समायरा दिवे (इ. तिसरी) व निकुंज लांजेकर (इ. दुसरी)च्या विद्यार्थ्यांना रौप्य आणि ब्राँझ पदक, रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्रक देऊन अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.



अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांना आयपीएस, आयएएस अधिकारी व्हावे अशी इच्छा प्रकट करून तुम्ही सामान्य ज्ञानबरोबरच इतर स्पर्धा परीक्षांचा देखील अभ्यास करून त्या परीक्षा द्या. आजच्या काळात जागतिक चालू घडामोडी माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही कायमच सतर्क आणि संलग्न राहून घडणाऱ्या गोष्टींचा आढावा घेत रहा असे सांगितले.



ज्यावेळी आपण मैदानात फुटबॉल स्पर्धा खेळायला जातो त्यावेळी तो बॉल टाकण्यासाठी जाळीच नसेल तर त्या स्पर्धेला अर्थ नाही, याचा अर्थ असा की तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करा तो गोल साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून तुमचे लक्ष्य साधा, असा छान सल्ला सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना दिला. स्पर्धा परीक्षा मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. सर्वांचे अभिनंदन करून ज्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही त्यांनी नाराज न होता पुन्हा पुढच्या वर्षी नव्याने प्रयत्न करा असे खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी मुलांना सांगून त्यांना प्रोत्साहन दिले.



जे. एम. एफ. शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेची जबाबदारी संपूर्णतः वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका शर्वरी मॅडम यांनी सांभाळली होती. जन गण मन शाळेच्या उपप्राचार्या ज्योती व्यंकट रामन यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या नावाची घोषणा केली. कार्यक्रमाचे शेवटी संगीत शिक्षिका श्रेया कुलकर्णी यांनी संपूर्ण वंदे मातरम् म्हटल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.







Post a Comment

Previous Post Next Post