माणकोली – मोठागाव खाडीपुलामुळे होणार वाहतूककोंडी

 


वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी पालिका आयुक्तांचा पाहणी दौरा

    डोंबिवली /  शंकर जाधव:  माणकोली ते मोठागाव ठाकुर्ली जोडणाऱ्या खाडी पुलाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे .मे अखेर पर्यंत हे काम पूर्ण होवून तो पूल जूनमध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे – डोंबिवली अंतर २० मिनिटात गाठता येईल. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे .हा सहा पदरी पूल डोंबिवलीत जिथे उतरणार आहे, तो मोठागाव ते डोंबिवली स्टेशन रस्ता अवघा दुपदरी आहे. त्यातच मोठागाव येथे रेल्वे फाटक आहे.तसेच संपूर्ण डोंबिवलीत चार पदरी देखील एकही रस्ता अस्तित्वात नाही .त्यामुळे सहापदरी माणकोली – मोठागाव पूल वाहतुकीसाठी सुरु झाल्यावर डोंबिवली पश्चिमेत नव्याने वाहतूक कोंडीचे संकट निर्माण होणार आहे.येथील डीपी प्लान मधीक सात रस्ते रिंगरुटला जोडले जातील.शहराबाहेरून येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये याकरता अंर्तगत तीन रस्ता बनविला जाणार असून याची पाहणी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे व शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली.

       डोंबिवली हे रेल्वे मार्गावरील शहर आहे .या शहरातून एकही राष्ट्रीय वा राज्य महामार्ग जात नसल्याने डोंबिवलीतून ठाणे ,मुंबईला ये - जा करण्यासाठी कल्याण, भिवंडी – नाशिक बायपास मार्गे किंवा कल्याण शिळफाटा ,मुंब्रा मार्गे जावे लागते. या दोन्ही मार्गांमुळे वेळ व इंधन अधिक प्रमाणात खर्च होत आहे. अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हीच होणारी गैरसोय लक्षात घेवून एमएमआरडीएने सुमारे २२३ कोटी २५ लाख रुपये खर्चाचा हा पूल बांधण्याचा निर्णय २०१६ मध्ये घेतला. हा पूल पूर्ण झाल्यावर डोंबिवलीतून ठाणे गाठण्यासाठी अवघ्या २० मिनिटांचा कालावधी लागणार असल्याने हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.सध्या या पुलाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे .मे अखेरीस या पुलाचे काम पूर्ण होवून जून महिन्यात पूल वाहतुकीला खुला केला जाण्याची चिन्हे आहेत.

हा पूल सहापदरी असल्याने या पुलावरून छोटी ,मोठी प्रवासी वाहने व अवजड वाहने देखील जाणार आहेत .मात्र पूल पूर्णत्वास जाण्यापूर्वी काटई – कोपर – मोठागाव व मोठागाव – कल्याण असा प्रस्तावित असलेल्या रिंगरोडचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे.रिंगरोडचे काम पूर्ण झाले असते तर मोठागाव येथून बाहेरच्या बाहेर कोपर मार्गे काटईकडे व ठाकुर्ली ,कल्याणकडे वाहने जावू शकली असती .तसेच हा पूल ज्या मोठागाव येथून डोंबिवली स्टेशनकडे जातो ,त्या मार्गावर मोठागाव चौकात वसई – दिवा रेल्वे मार्ग रेल्वे फाटक आहे .हे रेल्वे फाटक बंद करून तेथे रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचे काम मंजूर झाले असले तरी त्याची सुरुवात देखील झालेली नाही .त्यामुळे जोपर्यंत मोठागाव चौकातील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणार नाही ,तोपर्यंत याच ठिकाणी मोठी वाहतुकीची कोंडी होवून मोठागाव ठाकुर्लीतील नागरिकांना आपल्या वाहनाने घराबाहेर पडणे देखील मुश्कील होणार आहे.

भविष्याचा विचार करून माणकोली – मोठागाव पूल जरी सहापदरी करण्यात आला असला तरी डोंबिवली शहरातील एकही प्रमुख रस्ता देखील चारपदरी नाही .त्यामुळे माणकोली – मोठागाव पूल वाहतुकीसाठी सुरु करण्यापूर्वी मोठागाव ते जुनी डोंबिवली व कोपर तसेच देवीचा पाडा रेल्वे अंडर पास पर्यायी रस्ते सुरु करावे लागणार आहेत .तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण केले नाही तर आधीच वाहतुकीच्या कोंडीत अडकलेल्या डोंबिवली शहरात आणखी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचे संकट निर्माण होणार आहे .ठाण्याहून २० मिनिटात डोंबिवलीच्या सीमेवर आलेल्या शहरात पोहोचायला ३० मिनिटे आणखी लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.यावर पालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे व शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी पाहणी करून तात्पुरत्या तीन रस्ता शहराला जोडला जाईल जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही असे सांगितले.





Post a Comment

Previous Post Next Post