मुंबई : उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना उद्यापासून सुटी जाहीर करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री, दीपक केसरकर यांनी सांगितले.
राज्यात उष्णतेची प्रचंड लाट पसरली असून हवामानात सुद्धा सातत्याने बदल होत असून सावधगिरीचा उपाय म्हणून राज्यातील ज्या शाळांच्या परीक्षा संपल्या असतील त्यांना आजपासूनच सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सुट्टीचा आस्वाद घेण्यासाठी शाळांनी गृहपाठही देऊ नये असे शालेय शिक्षण मंत्री, दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.
शिक्षणमंत्र्यांनी उन्हाळी ही सुट्टी विद्यार्थ्यांना मौज - मस्ती करण्यासाठी असते. त्या सुट्टीचा त्यांनी आस्वाद घ्यायला हवा. शाळांनी या सुट्टीत १० वी चे विद्यार्थी वगळता इतर विद्यार्थ्यांना अभ्यास देऊ नये, असेही केसरकरांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील शाळा १३ जून ऐवजी १५ जून रोजी सुरु होणार आहे. तसेच विदर्भात ३० जून रोजी शाळा सुरु होणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली आहे.
यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे पुढील शैक्षणिक वर्ष १५ जून पासून तर विदर्भातील शाळा ३० जून पासून सुरू होतील. तथापि सध्या असलेली उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना उद्यापासून सुटी देण्यात येत आहे. सुटीच्या कालावधीत ज्या शाळांना अतिरिक्त उपक्रम राबवायचे असतील त्यांनी ते सकाळच्या अथवा संध्याकाळच्या सत्रात घ्यावेत. तथापि यासाठी नववी अथवा दहावीचे विद्यार्थी वगळता इतर वर्गातील विद्यार्थ्यांना बोलावण्यात येऊ नये. इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाचा बोजा न देता सुटीचा आनंद उपभोगू द्यावा, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.
.jpeg)
