दिवा : दिवा स्मशानभूमी मध्ये पाणी व्यवस्था नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मरणानंतर ही प्रेताला शेवटच पाणी पाजण्यासाठी पाणी मिळू नये ही शरमेची गोष्ट आहे. ते शेवटचे पाणी ही नागरिकांना स्वतःच्या घरून आणावे लागत आहे. ही गैरसोय लक्षात घेऊन येथील स्मशानभूमीत पालिकेने पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे..
दिव्यात पाणी नाही हे दिव्यातील लोकांच्या पाचवीला पुजलेल आहे असं नेहमीच म्हटलं जातं. दिवा विभागात कित्येक वर्ष पाण्याची कृत्रिम टंचाई आहे. दिवा विभागाला पुरेसा पाणी उपलब्ध असताना सुद्धा दिव्यातील लोक पाण्यासाठी वणवण करताना दिसतात. परंतु जिवंतपणे लोकांना येथे पाणी मिळत नाही, टँकरने पाणी विकत घेऊन जीवन जगाव लागत आहे. परंतु मेल्यानंतर ही ज्या स्मशानभूमीत आपण अंत्यविधी करत असताना मयताला शेवटच आपण पाणी देतो. परंतु त्या पाण्यासाठीही तिथे लोकांना वणवण करावी लागते, यापेक्षा दुसरी शोकांतिका काय? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
आज दिव्यात आगासन, बेतवडे, म्हातार्डी, दातिवली, दिवा, साबे या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या पूर्वीच्या स्मशानभूमी आहेत. परंतु आज 35 वर्षांपेक्षा जास्त कार्यकाल ठाणे महानगरपालिकेत ही गाव असून सुद्धा अजून या महापालिकेच्या स्मशानभूमीत पाण्याच्या लाईन देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे येथे स्मशानात येताना लोकांना हातामध्ये पाण्याचे कॅन घेऊन स्मशानात येऊन सर्व विधी पूर्ण करावी लागतात. ही महापालिकेसाठी लज्जास्पद गोष्ट आहे, की ज्या दिवा भागातून करोडो रुपये महसूल वसूल केला जातो, परंतु ज्या नागरिकांसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत, त्याकडे मात्र महापालिका जाणून-बुजून दुर्लक्ष करते, असा आरोप दिव्यातील जागरूक नागरिक करत आहेत.
रोहीदास मुंडे, भाजपा अध्यक्ष, दिवा - दिवा विभागातील सर्व स्मशानभूमीला तातडीने पाण्याच्या लाईन देण्यात यावी, अन्यथा दिवा भाजप तर्फे आंदोलन करण्यात येईल. या संदर्भात ठाणे महानगरपालिका आयुक्तांशी भाजपची कार्यकारणी चर्चा करणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.