डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण – डोंबिवलीतील शहरातील अनेक रस्त्यावर खड्डे पडल्याने वरूणराजाने पुन्हा यावर्षी पालिका प्रशासनाचे काम निकृष्ट दर्जाची असल्याचे समोर आणले. डोंबिवली शहरातील अनेक रस्ते काँक्रीटकरण व डांबरीकरणाचे कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.पावसाने उशिरा हजेरी लावल्याने आता शहरातील अनेक रस्त्यावर खड्डेच खड्डेच पडल्याचे दिसतात. पाच दिवसात पाच हजार खड्डे पडल्याने याला जबाबदार पालिका प्रशासन असून ज्या ठेकेदाराला हि कामे दिली आहे त्याच्यावर कारवाई होईल का असा प्रश्न डोंबिवलीकर विचारीत आहेत.
यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली असली तरी नालेसफाई आणि रास्यांची कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रशासकीय राजवट असल्याने संबधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांनी म्हटले असून त्यामुळे यावर्षी वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.पाच दिवसाच्या पावसात डोंबिवलीतील रस्त्यात पाच हजार खड्डे पडल्याने नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.
डोंबिवली पूर्वेकडील पी पी चेंबर समोरील रस्त्यावरील पडलेले खड्डे हे वाहनचालकांना त्रासदायक ठरत आहे. पुढे टिळक चौक, मंजुनाथ चौक, शेलार नाका आणि घरडा सर्कल हे रस्ते वाहनचालकांना आपण बैलगाडी चालवीत असल्याचे वाटते. मंजुनाथ चौकात शाळा असल्याने वाहने चालवित खड्डे वाचविताना वाहनचालकांचा अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्यात खड्डे जास्त पडल्यानंतर काही वेळ पावसाने विश्रांती घेतल्यावर प्रशासनाकडून खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले जाते. पण अद्याप प्रशासन थंड आहे आणि लोकप्रतिनिधींनी यावर प्रशासनाला जाब विचारला नाही.
डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडीतील संत नामदेव पथवर रस्ता काँक्रीटचे काम व्यवस्थित सुरु नसल्याने मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज घरत यांनी संबधित विभागातील अधिकाऱ्यांना जाब विचारला. रिक्षाचालकांना वळसा घालून जावे लागत असल्याने येतील प्रवाशी भाडे नाकारले जाते. तर दोन दिवसात रस्ता दुरुस्त करून द्या असा इशारा दिल्यानंतर काम सुरु झाले.
२० कोटी रुपये मंजूर तरीही कामाचा पत्ताच नाही
याबाबत कार्यकारी अभियंता यांना संपर्क केला असता ते म्हणाले. रस्त्याच्या कामासाठी निविदा काढून २० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण, पावसाळ्यात खड्डे खडीने भरणे, नंतर उर्वरित कामे पूर्ण करणे अशी कामे आहेत.मात्र यावर्षी पावसाळ्यात खड्डे भरण्याच्या कामांना मुहूर्त कधी आहे याचे उत्तर प्रशासनाकडेही नाही.
घरडा सर्कल नव्हे खड्डा सर्कल
डोंबिवली पूर्वेकडील घरडा सर्कल हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर वाहनाची सतत वर्दळ असते. पावसाळ्यात हा रस्ता वाहनचालकांना धोकादायक बनतो. पावसाळ्यापूर्वी घरडा सर्कल वर डांबरीकरण काम किती निकृष्ट दर्ज्याचे आहे हे समाजसेवक सत्यवान म्हात्रे यांनी पत्रकारांसमोर सांगितले होते. करदात्या नागरिकांचा पैसा कसा वाया जात आहे याचे जिवंत उदाहरण घरडा सर्कलच्या रस्त्यावरील डांबरीकरणातून दिसून येते असते म्हात्रे यांनी सांगितले.या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांला काळ्या यादीत टाकून उत्कृष्ट दर्ज्याचे काम करावे अशी मागणी केली आहे.