ग्राम ऊर्जा स्वराजसह सर्वोत्तम पंचायत पुरस्कार
नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
पाटण : ग्रामविकासामध्ये प्रभावी काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना पंचायती राज मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा पुरस्कार यावर्षी साताऱ्यातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे. त्याचबरोबर ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पुरस्कार देखील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला देण्यात येणार आहे. हा पुरस्कार बुधवारी दि. ११ डिसेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून यावेळी गावकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.
पंचायत राज मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ग्राम स्तरावरील विविध पुरस्कारांची घोषणा या विभागाच्यावतीने करण्यात आली. यामध्ये शाश्वत विकासाच्या नऊ संकल्पनांवर आधारित असलेल्या गरिबी मुक्त गाव, आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ हरित गाव, पायाभूत सुविधांनी युक्त स्वयंपूर्ण गाव, सामाजिक न्याय व सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासन युक्त गाव व महिला स्नेही गाव या बाबींवर विशेष काम करून गावाला विकासाचे गाव म्हणून दर्जा मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात अशा गावाला हा पुरस्कार दिला जातो.
शासनाने जाहीर केलेल्या शाश्वत विकासाच्या नऊ संकल्पनांवर काम करणाऱ्या अनेक ग्रामपंचायतीने या पुरस्कारासाठी अर्ज दाखल केले होते. त्याला अनुसरून पंचायत राज मंत्रालयाच्यावतीने ग्रामपंचायतींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार राबविलेल्या मुद्यांची खातरजमा केल्यानंतर सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कारासाठी मान्याचीवाडी ग्रामपंचायतीच्या नावाची घोषणा करण्यात आली. मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामविकासात विविध उपक्रम राबवत उल्लेखनीय काम केले आहे.
राज्यातील पहिले सौर ग्राम ठरलेल्या आणि अपारंपारिक ऊर्जा निर्मितीचे प्रभावी काम केल्याबद्दल एक कोटी रुपयांचा प्रथम क्रमांकाचा ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पुरस्कारही जाहीर करण्यात आला आहे. एकाच वेळी देशपातळीवरील सर्वोत्तम दोन पुरस्कार आपल्या एकाच गावाला मिळाल्याने ग्रामस्थांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. या पुरस्कारांसाठी यशदाचे उपमहासंचालक डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमाळे, गटविकास अधिकारी सविता पवार, अनिल वाघमारे, राज्य समन्वयक अनिल बगाटे, श्रीधर कुलकर्णी, अमीर शेख, संतोष सकपाळ, बाळासाहेब बोराटे,जोती पाटील,मधुकर मोरे आदींचे मार्गदर्शन लाभल्यामुळेच हा पुरस्कार मिळविण्यात यश आल्याचे सरपंचांनी म्हटले.