मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांचे निर्देश
अलिबाग, ( धनंजय कवठेकर ) : रायगड जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरु असून, अनेक गावे स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श होत आहेत. जिल्ह्यातील ८०९ ग्रामपंचायतीमधील १ हजार ८३० गावांपैकी १ हजार ५४६ गावे ओ.डी.एफ प्लस मॉडेल झाली आहेत. १५ व्या वित्त आयोगातील बंधित निधीमधून जास्त जास्त निधी स्वच्छतेच्या कामावर खर्च करण्याचे निर्देश राजगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांना दिले आहेत.
ग्रामपंचायतीनी सन २९२५-२६ चा गाव कृती आराखडा तयार करताना स्वच्छ भारत मिशन व १५ व्या वित्त आयोगाच्या बंधित निधीतून सार्वजनिक कंपोष्ट पिट,प्लास्टिक संकलन शेड,सांडपाणी व्यवस्थापनासाठी स्थिरीकरण तळे, सार्वजनिक शोषखड्डे,सांडपाणी प्रक्रिया केंद्र,कचरा विलगीकरण केंद्र, घरगुती व सार्वजनिक स्तरीय कचराकुंड्या घेणे, कचरा वर्गीकरण व परिसर सफाईसाठी उपयुक्त अवजारे व कर्मचारी यांचेसाठी संरक्षण साहित्य घेणे, खत टाकी/नाडेप/गांडूळखत प्रकल्प उभारणी, गोबरधन आणि प्लास्टिक कचरा प्रक्रिया देखभाल व दुरुस्ती, कम्पोष्टिंगसाठी आवश्यक साहित्य घेणे ,प्लास्टिक कचरा वाहतुकीसाठी वाहनाची व्यवस्था करणे, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाचे रेट्रोफिटिंग, कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण करणे यासाठीचे मानधन व वेतन,तीन चाकी सायकल/बँटरी आधारित सायकल घेणे या कामाना प्राधान्य देण्यासाठी हा निधी ग्रामपंचायतीनी वापरावा, असेही डॉ. भरत बास्टेवाड यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये,पाणी पुरवठा योजना, पथ दिवे हे सौरउर्जा प्रकल्पावरअसतील असे नियोजन करावे. ही कामे आराखड्यात न घेतल्यास संबाधीतावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करणात येईल अशा सक्त सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांना दिल्या आहेत. यामुळे ही गावे स्वच्छ,सुंदर व आरोग्यसंपन्न होतील व स्वच्छतेत सातत्य राहण्यास मदत होणार आहे.