रायगड, (धनंजय कवठेकर) : मुंबई-गोवा महामार्गावर एका भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. एका भरधाव टोईंग व्हॅनच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू तर एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातील वीर रेल्वे स्टेशनजवळ हा अपघात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाला. जखमींवर सुरुवातील महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले.
महाडमधील काही तरुण स्कॉर्पिओ गाडीने माणगावच्या दिशेने जात होते. त्यांच्या स्कॉर्पिओ वाहनातील डिझेल संपल्याने ते महामार्गालगत उभे होते. त्याच दरम्यान मागून येणाऱ्या एका टोईंग व्हॅनने (एमएच-१४-सीएम-३०९) उभ्या असलेल्या या सहाजणांना जोरदार धडक दिली. ही घटना महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्टेशनजवळ घडली. ही धडक इतकी जबरदस्त होती की बंद पडलेली स्कॉर्पिओ गाडी जवळपास ५० फूट लांब फेकली गेली. तर या युवकांना अंदाजे १० फूट फरफटत नेले.
या दुर्घटनेत तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. सूर्यकांत सखाराम मोरे (नवेनगर), साहिल नथुराम शेलार (२५) आणि प्रसाद रघुनाथ नातेकर (२५, कुंभारआळी) अशी त्यांची नावे आहेत. तर समीप सुधीर मिंडे (३५, दासगाव) याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सध्या सूरज अशोक नलावडे (३४) आणि शुभम राजेंद्र मातळ (२६) याच्यावर मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
हे सहाही जण त्यांच्या गाडीसह उभे असताना भरधाव टोईंग व्हॅनने त्यांना मागून धडक दिली. यात बंद पडलेली गाडी ५० फूट लाब फेकली केली आणि सर्व्हिस रोडच्या पलीकडे खड्ड्यात पडली. मध्यरात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली.


