जे. एम. एफ. संस्थेच्या प्रांगणात शिव गर्जनेचा आवाज घुमला



दिवा, (आरती परब) - अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचा राजा आणि महाराष्ट्राच्या कडे कपारितून घुमणारा आवाज म्हणजे 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचा. महाराजांची जयंतीनिमित्त शिव गर्जनेचा आवाज जे. एम. एफ. संस्थेच्या प्रांगणात घुमला. जे. एम. एफ. शिक्षण संस्था संचालित वंदे मातरम् पदवी महाविद्यालय, जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिर यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात शिव जयंती साजरी केली गेली. एखादे वादळ घोंगावत असताना त्या वादळामधून येणारा आवाज हा सर्वत्र ठिकाणी घुमतो तसंच जणू 'जय भवानी, जय शिवराय' चा ध्वनीने संपूर्ण जे. एम. एफ. संस्था आणि संस्थे बाहेरचा परिसर गजबजून गेला.


एक महिना पूर्व तयारी करत असलेले महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी हिंदुत्वाच्या भावनेने काल शिव जयंती उत्साहात साजरी केली. संस्थेचे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नाडर सर, शाळेच्या उप मुख्याध्यापिका तेजावती कोटीयन तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी, पालक यांनी हजेरी लावून कार्यक्रमाचा आनंद लुटला. पालखीमध्ये शिवाजी महाराज यांची मूर्ती ठेऊन ढोल ताशे, लेझिम वाजवत भव्य शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण शाळा व परिसर फुलांनी सजवला होता. शिवकालीन संस्कृती जपत सर्व विद्यार्थिनींनी नऊवारी साडी नेसून तर विद्यार्थ्यांनी सदरा घालून हातात हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकवत गर्जनेत नृत्य केले.


प्रवेश दाराजवळ पालखीचे आगमन होताच संस्थेचे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला औक्षण केले. तर सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे व संगीत शिक्षिका श्रेया कुलकर्णी यांनी पालखी वीरांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुलभा गायकवाड तसेच माजी नगरसेवक महेश दादा पाटील व इतर मान्यवर यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. शाल, श्रीफळ, प्रेमाचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली.


शालेय विद्यार्थ्यांनी बाळ शिवाजीचा पाळणा म्हणत नृत्य सादर केले. तर मुलांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा आणि शिवगीत सादर केले. इयत्ता तिसरीमधील यश खामकर या विद्यार्थ्याने मावळा होऊन गायन व नृत्य सादर केले. त्याच बरोबर इतर विद्यार्थ्यांनी शिव गर्जना करून शिवाजी अफझलखान यांची नाटिका सादर केली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील बहारदार नृत्य सादर करून शिवरायांना मानवंदना दिली.


ज्या प्रमाणे काशी विश्वेश्वर हे भगवान शंकराच्या त्रिशूळावर टिकून आहे, उभे आहे त्याच प्रमाणे आपला हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीच्या टोकावर भक्कमपणे उभा आहे, असे उद्गार काढून डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सर्वांना शिव जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. इयत्ता चौथीमधील अर्णव डोंगरे या विद्यार्थ्याने स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्कृष्ट चित्र रेखाटले होते. खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी त्याचे कौतुक करून प्रशस्ती पत्रक व बक्षीस दिले. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे कौतुक करून, आज आपल्याल्या बाल शिवबा ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकाच वेळी दर्शन घडले. यासारखा मणी कांचन योग नाही असेही जान्हवी कोल्हे यांनी वक्तव्य केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन एकनाथ चौधरी यांनी केले व पुनश्च शिव गर्जना करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.








Post a Comment

Previous Post Next Post