उपमुख्यमंत्री शिंदे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई : गिरणी कामगारांनी मुंबईसाठी मोठा त्याग केला आहे. त्यामुळे या कामगारांना मुंबईत घरे देण्यास आमचे प्राधान्य आहे. जास्तीत जास्त कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी एनटीसीसमवेत तातडीने बैठक घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री यांनी शुक्रवारी सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या आढावा बैठकीनंतर संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
गिरणी कामगारांनी मुंबईसाठी मोठा त्याग केला आहे. त्यामुळे या कामगारांना मुंबईत घरे देण्यास आमचे प्राधान्य आहे. जास्तीत जास्त कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी एनटीसीसमवेत तातडीने बैठक घ्यावी, अशा सूचनाही याप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. शेलू आणि वांगणी येथील घरांच्या किंमती कमी करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असेही यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंत गिरणी कामगारांना १५ हजार ८७० घरे दिली असून सुमारे एक लाख पात्र गिरणी कामगारांनाही घरे उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही देतानाच, गिरणी कामगारांनी एमएमआर क्षेत्रात घरांना प्राधान्य द्यावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. राज्य शासनाच्या माध्यमातून एमएमआर परिसरात विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दळणवळण सुविधांचे जाळे भक्कम करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे एमएमआर क्षेत्रातील घरांनाही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला राज्यमंत्री पंकज भोयर, माजी मंत्री रामदास कदम, आमदार कालिदास कोळंबकर, माजी खासदार राहुल शेवाळे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नविन सोना, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्यासह गिरणी कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.