जिल्हाधिकारी कर्डिले यांचे आवाहन
नांदेड : "नांदेड जिल्हा बालविवाहमुक्त व्हावा, यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येत समन्वय साधून कार्य करणे आवश्यक आहे," असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नांदेड येथे एका विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
ही कार्यशाळा हॉटेल सिटी सिंफनी, नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्यातील विविध विभागांनी नियुक्त केलेल्या "बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्स" ना प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, शिक्षणाधिकारी प्रा. सविता बिरगे, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगे, परिवीक्षा अधिकारी गजानन जिंदमवार आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारींचा स्पष्ट इशारा
जिल्हाधिकारी कर्डिले यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, कोणत्याही बालविवाहाच्या प्रकरणात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. बालविवाहात कोणतेही बालक ओढले जाणार नाही, यासाठी सर्व विभागांनी जागरूक राहणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणात घेतले गेलेले विषय:
- जिल्हा कृती आराखड्याची अंमलबजावणी आणि देखरेख
- तालुकानिहाय बालविवाह हॉटस्पॉट गावांची ओळख
- बालविवाहाची सामाजिक, आर्थिक कारणे व उपाय
- बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ बाबत माहिती
- किशोरवयीन मातांसाठी सहाय्यक यंत्रणांचा समन्वय
- युनिसेफचा जागतिक कार्यक्रम व कम्युनिकेशन किटचा वापर
- साप्ताहिक अहवाल फॉरमॅट व कृती दलाच्या बैठकीसाठी नियोजन
- प्रेरणादायी प्रकरणांचे दस्तऐवजीकरण व माहिती विश्लेषण
या प्रशिक्षणात पंचायत विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग (जि.प.), चाईल्ड लाईन १०९८, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम (RKSK), आणि उमेद अभियानाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
एसबीसीथ्री संस्थेचे प्रकल्प अंमलबजावनी प्रमुख नंदू जाधव, वरिष्ठ प्रकल्प समन्वयक कृपाली बढिये, प्रकल्प समन्वयक रुचिका अहिरे आणि मोनाली धुर्वे यांनी प्रशिक्षणात मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्या अखेरीस जिल्हाधिकारी कर्डिले यांनी उपस्थित “चॅम्पियन्स” सोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच कृती आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांचे मनोबल वाढवले.