एसटी महामंडळाच्या 'स्मार्ट बस'मधील आयटी सुरक्षा प्रणालीची पाहणी
प्रगत तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची हमी
ठाणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ठाणे–नागपूर दरम्यान धावणाऱ्या नव्या ‘स्मार्ट बस’मध्ये बसवलेल्या अत्याधुनिक आयटी सुरक्षा प्रणालींची आज प्रत्यक्ष पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या पाहणी दरम्यान बसमध्ये बसवण्यात आलेल्या विविध उपकरणांची कार्यप्रणाली तपासून त्यांच्या उपयुक्ततेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या पाहणीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बसमधील प्रगत प्रणालींमुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या 'स्मार्ट बस'मध्ये ADAS (Advanced Driver Assistance System) बसवण्यात आले असून, ही प्रणाली वाहन चालवताना चालकाला विविध प्रकारच्या धोक्यांची पूर्वसूचना देते. यामुळे अपघातांची शक्यता कमी होते. तसेच चालक निरीक्षण कॅमेरे (Driver Monitoring Cameras) हे चालकाच्या चेहऱ्यावरील हालचाली, डोळ्यांची उघडझाप आणि थकवा यावर लक्ष ठेवतात. चालक मद्यपानाच्या स्थितीत असेल किंवा झोप येत असल्यास लगेच सायरनद्वारे इशारा दिला जातो.
चालकाच्या मदतीसाठी बसमध्ये ३६०° ब्लाइंड स्पॉट कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे बसच्या चारही बाजूंनी दृश्य देतात. यामुळे चालकाला मागील आणि बाजूंचे अंधकोन सहजपणे समजतात, ज्यामुळे वाहन अधिक सुरक्षितपणे चालवता येते.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसच्या प्रवासी भागात २ कॅमेरे, तसेच बसच्या समोर आणि पाठीमागे प्रत्येकी १ कॅमेरा बसवण्यात आला आहे. यामुळे बसमध्ये होणाऱ्या सर्व हालचालींची सतत नोंद घेतली जाऊ शकते. याशिवाय, मोबाईल जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली, चालक सहाय्यक स्क्रीन, एलसीडी स्क्रीन, आणि पब्लिक अॅड्रेस सिस्टमसारखी आधुनिक साधनेही बसमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहेत.
या तंत्रज्ञानाच्या मदतीने महिलांना विशेषतः रात्रीच्या प्रवासात अधिक सुरक्षिततेची हमी मिळणार आहे. चालकाचे वर्तन, बसचा वेग, वळणांवरील नियंत्रण आणि बाहेरील घडामोडी यावर सतत नजर ठेवता येणार असल्यामुळे गरज पडल्यास तात्काळ उपाययोजना करता येतील.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले की, “संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारच्या स्मार्ट बससेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. यामुळे प्रवाशांचा विश्वास बससेवेवर अधिक वाढेल आणि खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल.”