शिवराज्याभिषेक सोहळा जिल्हा परिषद ठाणे येथे जल्लोषात साजरा

 


ठाणे :  छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन म्हणजेच शिवस्वराज्य दिन  जिल्हा परिषद, ठाणे येथे शुक्रवारी अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. स्वराज्य, सार्वभौमत्व आणि स्वाभिमानाचे प्रतीक ठरलेल्या या ऐतिहासिक घटनेचा स्मृतिदिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर शासन निर्देशानुसार शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येतो.

       जिल्हा परिषद ठाणेच्या आवारात आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, राजमाता व महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. यानंतर मानाची स्वराज्यगुढी उभारून वंदन करण्यात आले. उपस्थितांनी राष्ट्रगीत व राज्यगीत गायन करत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’ च्या घोषणांनी परिसरात उत्साही वातावरण निर्माण केले.

        या वेळी मार्गदर्शन करताना प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे म्हणाल्या, "छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळणारी प्रेरणा ही आपल्या प्रामाणिक आणि चिकाटीच्या कार्यपद्धतीची मूळ प्रेरणा आहे. प्रत्येक अडचणीवर मात करत कार्य करत राहणे हेच खरे शिवस्वराज्य साध्य करण्याचे माध्यम आहे." त्यांनी उपस्थित सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.



         कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) अविनाश फडतरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, कार्यकारी अभियंता (बांधकाम विभाग) संदीप चव्हाण, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग प्रमुख प्रकाश सासे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास महाजन, बालविकास प्रकल्प अधिकारी धनश्री साळुंखे, पशुसंवर्धन विभाग प्रमुख (प्रभारी) डॉ. किर्ती डोईजोडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी रविंद्र तरे व त्यांच्या समूहाने देशभक्तिपर गीत व पोवाडा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सूर्यवंशी यांनी प्रभावीपणे केले.




Post a Comment

Previous Post Next Post