अंबरनाथ \ अशोक नाईक: ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात पालिका क्षेत्रातील मदनसिंग उद्यानात वृक्षारोपण करत नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती घडवून आणण्याचा संदेश देण्यात आला.
वसुंधरेचे एक अविभाज्य अंग म्हणजे पर्यावरण! त्या अनुषंगाने अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी उद्यान विभाग प्रमुख नवनीत देवरे, जितेंद्र केदार तसेच अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.
या उपक्रमात सुमारे २०० झाडे लावण्यात येणार असून, यामध्ये फळझाडे, फुलझाडे आणि स्थानिक हवामानास अनुरूप असलेली झाडे प्राधान्याने निवडण्यात आली आहेत.शिरीष, करंज, फणस, कांचन, कदंब, मोहोग, तामण, बिट्टी , गुलमोहर इत्यादी झाडांचा समावेश होता.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक असून, ही केवळ एकदिवसीय क्रिया न राहता दीर्घकालीन काळजी घ्यावी लागेल. अंबरनाथ शहर हिरवेगार व्हावे यासाठी नगरपरिषद कटिबद्ध आहे. कार्यक्रमाचा समारोप करताना मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी नागरिकांना एक झाड लावा आणि त्याचे पालनपोषण करा, असा संदेश दिला.