दिवा रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर दिवे बंद




महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा भीतीदायक वातावरणात प्रवास

दिवा / आरती परब :  दिवा रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागातील सरकते जिने, ठाणे दिशेकडील आणि मधला पादचारी पूल यांवर काल रात्री १ वाजता दिवे बंद असल्याने प्रवाशांना अंधारातून प्रवास करावा लागला. यामुळे संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता, ज्यामुळे विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना भीतीदायक वातावरणात प्रवास करावा लागला.




या पुलांवर रात्रीच्या वेळी अनेकदा भिकारी आणि गर्दुल्ले यांचा वावर असतो, ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. रात्री १ ते १.३० च्या दरम्यान दिवा स्थानकात येणाऱ्या शेवटच्या चार लोकल गाड्यांमधील प्रवाशांना या अंधारामुळे मोठ्या प्रमाणात असुरक्षित वाटले. मनसेचे दिवा पश्चिमचे शाखाध्यक्ष सागर निकम यांनी या समस्येची दखल घेतली. त्यांनी घटनास्थळाचे फोटो आणि व्हिडिओ काढून रेल्वे प्रशासनाकडे ट्विटरद्वारे रात्रीच तक्रार दाखल केली.


निकम यांनी या घटनेसाठी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरले आहे. दिवे बंद असताना पोलीस बंदोबस्त नसल्याने कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असेल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, त्यांनी तातडीने दिवे सुरू करण्याची आणि रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण असून, रेल्वे विभागाच्या नियमित देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





Post a Comment

Previous Post Next Post