टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धा पुण्यातच खेळवली जाणार!



  • स्पर्धा संयोजकांना आत्मविश्वास

पुणे : जगभरातील आघाडीच्या टेनिसपटूंच्या सहभागाने टेनिस विश्वात आकर्षण ठरलेल्या टाटा ओपन महाराष्ट्रच्या पाचव्या पर्वानंतरही ही स्पर्धा भविष्यातही पुण्यात राहिल असा आत्मविश्वास स्पर्धा संचालक प्रशांत सुतार आणि राज्य टेनिस संघटनेचे सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले. 

दक्षिण आशियातील एटीपी २५० मालिकेतील ही एकमेव स्पर्धा पुण्यातच कायम राहिल आणि महाराष्ट्र सरकारचा पाठिंबा कायम असेल, असे सुतार आणि अय्यर यांनी सांगितले. 

जागतिक स्पर्धांच्या आयोजनामुळे देशातील आणि पर्यायाने सर्वच स्तरावरील टेनिसच्या प्रसाराला चालना मिळते. अशा जागतिक दर्जाच्या स्पर्धा होणे आवश्यक आहे. आम्ही नागपुरात महिला चॅलेंजर्स स्पर्धेच्या आयोजनाचा विचार करत होतो. मात्र, आवश्यक टेनिस कोर्ट नसल्यामुळे आम्हाला या स्पर्धेच्या आयोजनाचा विचार सोडून द्यावा लागला. भविष्यात आम्ही तेथे चांगली टेनिस कोर्ट विकसित करण्याकडे लक्ष देणार आहोत. टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेच्या आयाजोना आम्हाला आवश्यक सुविधांची कल्पना आली आहे. त्यामुळे आम्ही आता झटपट पावले उचलू, असे राज्य टेनिस संघटनेचे सरचिटणीस आणि भारतीय टेनिस संघटनेचे संयुक्त सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले. 

एटीपी २५० मालिकेतील ही प्रतिष्ठेची स्पर्धा आयएमजीची असून, राईज वर्ल्डवाईड स्पर्धेचे व्यवस्थापन बघते आणि टाटा मोटर्सने देखिल या स्पर्धेला आर्थिक पुरस्कार दिला आहे. भारतातील ही सर्वात मोठी स्पर्धा सलग पाचव्या वर्षी महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने पुण्यात आयोजित केली जात आहे. महाराष्ट्र सरकारशी असलेली पाच वर्षांचा करार या स्पर्धेने संपुष्टात आला आहे. 

गेल्या पाच वर्षांत आम्ही या अजिंक्यपद स्पर्धेच्या माध्यमातून अनेक गोष्टी केल्या आहेत. सध्या आमच्या जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानावर आहेत. या स्पर्धेमधून बचत झालेल्या निधीचा आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केली. पुढील महिन्यात आम्ही उच्च कार्यक्षमता प्रशिक्षण अकादमीची आम्ही घोषणा करणात आहोत. महाराष्ट्रातील टेनिसपटूंसाठी हे सर्वात मोठे पाऊल असेल. हे सर्व एटीपी २५० मालिकेतील स्पर्धेमुळे आकारात येत आहे, असेही सुतार यांनी सांगितले. 

या स्पर्धेची उद्या शनिवारी अंतिम लढत होणार आहे. या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत १७व्या स्थानावर असलेल्या मरिन चिलीचचा समावेश होता. दुर्दैवाने त्याला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. दुहेरीत तीन ग्रॅंड स्लॅम विजेत्या राजीव राम-जो सॅलिस्बरी या आघाडीच्या जोडीचाही सहभाग होता. भविष्यात नोव्हाक जोकोविचसारखे खेळाडू या स्पर्धेत खेळावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, असेही सुतार म्हणाले.


महाराष्ट्र सरकार राज्यात अशा मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी वचनबद्ध आहे. सरकारने या स्पर्धेला पूर्ण पाठिंबा दिला आहे आणि भविष्यातही तो कायम राहिल यामुळे पुढील पाच वर्षे ही स्पर्धा सुरू ठेवण्यासाठी आमचे मनोधैर्य उंचावले आहे. संबंधित व्यक्तींबरोबर या संदर्भात चर्चा झाली असून, यातून सकारात्मक असाच निर्णय समोर येईल. स्पर्धेचे आणखी एक भागधारक आयएमजीबरोबरही आमची चर्चा पार पडली आहे. रिलायन्स आणि आयएमजीने आमच्याबरोबर असणे महत्वाचे आहे. असे यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले. 

प्रशांत सुतार

स्पर्धा संचालक  



Post a Comment

Previous Post Next Post