अकोला : बारसू रिफायनरीला आमचा विरोध आहे. एन्रॉनला घालवण्यातही आमची मोठी भूमिका होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना माझे आवाहन आहे की, कोकणाची वाट लावू नका. कोकणात आजही ९५% शुध्द ऑक्सिजन आहे. इथले वातावरण अत्यंत शुद्ध असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वनस्पती व प्राणी इथे नव्याने जन्माला येतात.
त्यामुळे ही शुद्धता तशीच टिकली पाहिजे. राहिला कोकणातील लोकांच्या जगण्याचा प्रश्न, तर मी सर्वांना आठवण करून देईन की, अंतुले मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी म्हटले होते की, पूर्ण वेळ मिळाला तर मी कोकणचा कॅलिफोर्निया करू शकतो. ते खोटं नव्हतं. परंतु जेव्हा त्यांनी हा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यात आले. प्रदूषणकारी उद्योग आणण्यापेक्षा इथल्या नैसर्गिक संपत्तीचे व्यवस्थित नियोजन केले आणि त्याच्याशी संबंधित कोकणी माणसाच्या उद्योगांना चालना दिली तर तेलंगणाप्रमाणेच इथल्या माणसाचे मासिक उत्पन्न वाढू शकते.
कोकणातील बारसू येथील स्थानिक ‘शेतकर्यांना’ तडीपारी, जिल्हाबंदीच्या नोटिसा देण्यात आल्याचे समजतयं. संविधानिक मार्गाने पंचक्रोशीतील सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेचे रिफायनरी विरोधाचे ठराव असतानाही दडपशाही केली जातेय. सरकार बारसूच्या शेतकऱ्यांवर दडपशाही करणार नाही अस सांगत, होते पण, नोटिसांमार्फत सरकारने दडपशाही सुरू केली आहे. ग्रामपंचायतींना न कळवता, विश्वासात न घेता हे सर्व सुरू आहे. ही सरळसरळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सांविधानिक हक्कांची पायमल्ली आहे.