ठाणे : ठाण्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा शुक्रवारी २४ तास बंद राहणार आहे. तर कोपरी परिसरात उद्या २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. स्टेम प्राधिकरणाच्या जल वाहिनीची देखभाल दुरुस्ती आणि ठाणे महापालिकेच्या जल वाहिनीची साकेत पुलावरील दुरुस्ती या कामांमुळे शुक्रवार २६ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून शनिवार २७ मे सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
स्टेम प्राधिकरणाच्या जल वाहिनीची देखभाल, दुरुस्ती यांची कामे या अवधीत केली जाणार आहेत. तसेच, ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जल वाहिनीची साकेत पूल येथे दुरुस्ती तसेच व्हॉल्व बदलेले जाणार आहेत. या कामांसाठी हा २४ तासांचा शट डाऊन घेण्यात येणार आहे. या काळात घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, ऋतू पार्क, कारागृह परिसर, गांधी नगर, रुस्तमजी, इंदिरा नगर, रुपादेवी, श्रीनगर, समता नगर, सिध्देश्वर, इटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळवा या भागातील पाणी पुरवठा बंद राहील. तसेच पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.
तसंच कोपरी येथील ठाणे महापालिकेच्या धोबीघाट जलकुंभाची ५०० मीमी व्यासाची मुख्य जलवितरण वाहिनी विकास कामात बाधित असल्याने स्थलांतरीत करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी क्रॉस कनेक्शन घेण्यात येणार असल्याने उद्या सकाळी ९ वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तासांसाठी कोपरी परिसरातील धोबीघाट आणि कन्हैयानगर जलकुंभावरुन होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
दिव्यात देखील पाणीपुरवठा बंद
दिव्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा शुक्रवारी ८ तास बंद राहणार आहे. दिवा प्रभाग समिती अंतर्गत निळजे येथून दिवा जुन्या प्रभाग क्र. २७ आणि २८ करीता ५०० मी.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहीनीव्दारे पाणीपुरवठा करण्यात येतो. या जलवाहीनीवर उसरघर रेल्वे कल्व्हर्ट पलावा सिटी कंपाऊन्ड, येथे मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली असल्यामुळे परिसरात वारंवार कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्या अनुषंगाने मुख्य जलवाहिनीला झालेली गळती थांबविणे अत्यावश्यक असून मुख्य जलवाहीनी वरील गळती बंद करण्याकरीता शुक्रवारी सकाळी १० ते ६ या वेळेत ८ तासाकरीता दिवा शहरातील प्रभाग क्र. २७ आणि २८ करीता होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
या परिसरातील पाणीपुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा. या गळतीचे काम पूर्ण झाल्यावर दिवा प्रभाग समिती अंतर्गत आगासन, बैतेवडे, गणेश नगर, बेडेकर नगर, म्हसोबा नगर, शांती नगर, बि.आर. नगर, मुन्द्रा देवी कॉलनी, साबे गाव, दिवा पश्चिम इ. परिसरसताल पाण्या संबंधित तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे. तरी दुरूस्तीच्या कामासाठी नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.