कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांची ग्वाही
डोंबिवली ( शंकर जाधव ) २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी पुन्हा भाजपने कंबर कसलेली असून या निवडणुकीमध्ये एनडीए ला लोकसभेला ४०५ जागा निश्चित मिळतील असे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी@९ या जनसंपर्क अभियान मोहिमेअंतर्गत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक जनसभा घेण्याचे निर्देश केंद्रीय नेतृत्वाने दिले आहेत. या जाहिरसभेचे आयोजन अंबरनाथ येथील शिवमंदिर येथे रविवारी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, पालिकेचे माजी उपमहापौर राहुल दामले, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष मिहिर देसाई उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गौरवशाली विकासाला नऊ वर्षे पूर्ण होत असताना थेट नागरिकांपर्यंत मोदी शासनाचा लेखाजोखा सादर करणे. जनमानसातील प्रतिक्रिया जाणून घेणे. नागरिकांशी संपर्क करत त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद देणे. यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींचा मोदी @९ अंतर्गत संपर्क अभियान सुरु आहे. त्याचा एक भाग म्हणून रविवारी अंबरनाथ येथे जाहिरसभा आयोजित करण्यात आली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये सहा विधानसभा क्षेत्र मतदार संघ आहेत. या सभेसाठी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी - कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
यावेळी आमदार रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली मध्ये विविध शैक्षणिक संस्थांमध्ये नवीन कोर्सेस सुरू होणार असल्याची माहिती दिली. डोंबिवली येथील एम्स हॉस्पिटल येथे नर्सिंग कोर्स सुरू असून तेथे आता बीएससी नर्सिंग हा पदवी कोर्स, तसेच टिळक विद्यालयात व्यवस्थापन पदवी ( बी एम एम) चा कोर्स सुरू केला जाईल. तर साउथ इंडियन शाळेमध्ये फिजिओथेरपीचा कोर्स यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार आहे. डोंबिवली व आसपास भागातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होऊ शकतो. त्याचप्रमाणे दत्तनगर येथील स्वामी विवेकानंद शाळेमध्ये विधी म्हणजे लॉ कॉलेज सुरू होणार असल्याची माहिती चव्हाण यांनी यावेळी दिली.