वसई : वसई तालुक्यात पश्चिम किनारपट्टीवर विकेंड पर्यटनासाठी सुट्टीच्या दिवशी खूपच गर्दी होते. मात्र पावसाळ्यातील समुद्रावर येणारी भरती किंवा वादळ तसेच धबधब्यात डुंबण्यासाठी उतरणारे पर्यटक बुडण्याची शक्यता असते. या दुर्घटना टाळण्यासाठी मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ - २ आणि ३ यांच्यातर्फे संपूर्ण वसई-विरारमध्ये रविवारपासून पर्यटन बंदी जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत १५ जुलैपर्यंत वसई-विरार हद्दीतील समुद्रकिनारे, धबधबे, धरणे अशा पर्यटनस्थळांपासून एक किमी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
पावसाळी सहलींचा आनंद लुटण्यासाठी वसईसह लगतच्या मीरा-भाईंदर व मुंबई परिसरातील पर्यटकही वसई-विरारमधील निसर्गरम्य पर्यटनस्थळांकडे आकर्षित होतात. सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वसईतील समुद्रकिनारे, धबधबे, धरणे आणि इतर पर्यटनस्थळी पर्यटकांचा ओढा वाढताना दिसत आहे. मात्र मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयाच्या पोलीस उपायुक्त परिमंडळ - २ आणि परिमंडळ-३ यांच्यातर्फे वसई आणि विरार क्षेत्रातील पर्यटनस्थळांच्या एक किमी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. आयुक्तालयामार्फत याबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे.
समुद्रकिनारे, धरणे, तलाव, धबधबे, नद्या यांच्या प्रवाहांच्या जोरदार पाण्यात उतरण्यास आणि पोहण्यास बंदी घालण्यात आली आहे. पावसामुळे धोकादायक झालेल्या ठिकाणी सेल्फी काढणे, मद्यपान करणे, मद्य वाहतूक करणे, वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे, वाहन अतिवेगाने चालविणे, वाहतुकीचे नियम न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा फेकणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
पर्यटनस्थळी अथवा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत वाजवणे आणि कोणत्याही प्रकारचे प्रदूषण करणे यास बंदी घालण्यात आली असून महिलांची छेडछाड, महिलांशी असभ्य वर्तन, अश्लील हावभाव करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पर्यटकांनी या आदेशाचे पालन करावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्तालयाच्या परिमंड - २ आणि परिमंडळ - ३ तर्फे देण्यात आला आहे.