२७ लोक मृत्यूमुखी, ५७ लोक बेपत्ता असून १४४ लोक जिवंत
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे बुधवारी झालेल्या भूस्खलनात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने अखेर शोध आणि बचाव मोहीम रविवारी सायंकाळी ५.३० वा. थांबवली असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. त्याचबरोबर बचावलेल्या १४४ लोकांच्या पाठिशी शासन ताकदीने उभे आहे. या लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे असे इर्शाळवाडी येथील बचाव कार्याचा आढावा व पाहणी संदर्भात खालापूर पोलीस स्टेशन येथे आयोजित आढावा बैठकीत सांगितले.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, दि.१९ जुलै रोजी इर्शाळवाडी या ठिकाणी दरड कोसळल्याने या आदिवासीवाडीतील ४३ घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली असून इर्शाळवाडीतील २२८ इतकी लोकसंख्या होती. यापैकी या दुर्घटनेत २७ लोक मृत्यूमुखी, ५७ लोक बेपत्ता असून १४४ लोक हयात आहेत. या हयात असलेल्या लोकांचे तात्पुरत्या जागेत पुनर्वसन करण्यात आले आहे. तसेच त्यांना लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा शासनाकडून पुरविण्यात आल्या आहेत. याबरोबरच जिल्हातील अन्य धोकादायक वाड्या आणि गावांचे पुनर्वसन करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
या कुटुंबाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी जागा निश्चित करून सिडको मार्फत सदर जागेचा विकास करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या दुर्घटनेच्या ठिकाणी बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, टीडीआरएफर, इमॅजिका कामगार, सिडकोचे कर्मचारी तसेच इतर सामाजिक स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनधी असे एकूण जवळपास १ हजार १०० लोकांनी उत्तमरित्या कामे केले त्यांचे शासनामार्फत आभार मानले. भविष्यात अशी दुर्देवी घटना घडू नये म्हणून शासन व जिल्हा प्रशासन खबरदारी घेईन, असेही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
याठिकाणी जिल्हा प्रशासनाने १४४ कलम लागू केले आहे. तरी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी आ.महेश बालदी, आ.महेंद्र थोरवे, विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, विशेष पोलीस निरीक्षक प्रविण पवार, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बढे , एनडीआरएफ कंमाडर तिवारी उपस्थित होते.