राज्यात पावसाचे धुमशान

  •  काही ठिकाणी रेड अलर्ट तर काहींकडे ऑरेंज अलर्ट 
  • तानसा धरण भरून वाहू लागले 
  • राधानगरी धरण १०० टक्के भरले

मुंबई: काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला चांगलेच झोडपले आहे. पावसाचा हा जोर काही दिवस असाच असणार अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे.  पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला असून कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. पावसाची ही स्थिती अशीच पुणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत उद्याही अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच जिल्ह्यातील आतापर्यंत 81 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरण १०० टक्के भरले आहे. धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले असून त्यातून ८ हजार ५४० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होत असताना नाशिक जिल्ह्याला मात्र अजूनही दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी नाशिक जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.जिल्ह्यात ६२ टक्के खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, त्यांनाही पावसाची प्रतिक्षा आहे. 

मुंबई ठाण्यात बुधवारी दुपारपासून शहरातील विविध भागात जोरदार ते मुसळधार पाऊस झाला. सायंकाळपर्यंत मुंबई शहरात सरासरी ७६.४५ मिमी पाऊस झाला होता. मुंबईच्या पूर्व उपनगरात सरासरी ५८.०१ मिमी पाऊस पडला, तर पश्चिम उपनगरात ७०.४३ मिमी पाऊस झाला. बुधवारी दुपारनंतर मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली. यानंतर अवघ्या काही तासात अंधेरी येथील सबवेमध्ये पाणी शिरल्याने तो बंद करण्यात आला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यालाही रेड अलर्ट जाहीर करण्यात आल्याने कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसंच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी शाळा (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व माध्यमिक) विद्यालयांना उद्या गुरुवार २७ जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जारी केला आहे. महाड तालुक्यात सर्वाधिक १४५ मिमी, तर अलिबाग तालुक्यात सर्वात कमी ४५ मिमी पाऊस झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

तुळशी पाठोपाठ तानसा धरण देखील भरून वाहू लागले आहे. बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास धरण भरले. दुपारी १२ च्या सुमारास तानसा धरणाचे सात दरवाजे उघडले असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. 



पावसामुळे अलर्ट 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.भारतीय हवामान विभागाने मुंबईसह, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यालाही हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.पावसाच्या रेड अलर्टनंतर मुंबई, रत्नागिरी व चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.


शाळांना सुट्टी 

भारतीय हवामान खात्याने गुरुवारपर्यंत अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेत मुंबई, ठाणे, सर्व शाळांना गुरुवारी सुटी देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील प्रशासनाने यापूर्वीच जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना गुरुवारपर्यंत सुट्टी जाहीर केली होती. 




.

Post a Comment

Previous Post Next Post