डोंबिवली ( शंकर जाधव ) : दिव्यांगांसाठी व महिलांसाठी रेल्वेगाडीत आरक्षित डब्बे असतात.मात्र गर्दीचे कारण सांगत या डब्यात इतर प्रवासीही प्रवास करतात.दिव्यांग प्रवासी व महिला प्रवासी यांनी याबाबत अनेक वेळेला रेल्वे प्रशासनाला कळविले होते.मात्र याकडे रेल्वे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याची ओरड सुरू होती.आता यावर रेल्वे पोलिसांनी लक्ष दिले असून कल्याण रेल्वे आर पी एफ वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त ऋषि कुमार शुकला व सहाय्यक सुरक्षा आयुक्त, कल्याण टी. रामचंद्रन याच्या आदेशानुसार ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि बदलापुर रेल्वे स्टेशन वर कारवाई करत दिव्यांग डब्यातून प्रवास करणाऱ्या ठाण्यातून (७२ ), डोंबिवलीतून (६७ ), कल्याणतून (८०) आणि बदलापूरमधून (५७) अशा २७६ प्रवाशांना ताब्यात घेतले.
रेल्वे प्रशासनाने कल्याण रेल्वे न्यायलयाचे न्यायाधीश विशेष रेलवे मजिस्ट्रेट स्वयम्. एस. चोपड़ा याच्या सहकार्याने रात्री न्यायालय चालवत रात्री आवश्यक कर्मचाऱ्यांना बोलावून घेत चक्क रात्र न्यायालय भरवत आर पी एफ कडून पकडलेल्या २७६ प्रवाशांनवर दंडात्मक कारवाई करत त्यांची सुटका करण्याचे निर्देश देतानाच पुन्हा नियम न तोंडल्यास थेट कारावासाची शिक्षा ठोठावली जाईल अशी सूचना या प्रवाशांना दिली. तसेच प्रवाशांची सुरक्षा रेल्वेसाठी महत्वाची असल्याने यापुढेही काळात गरज पडल्यास अशा प्रकारची कारवाई केली जाणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
