कल्याण ( शंकर जाधव ) : कल्याणमधील ऊंबर्डे येथील प्रकल्पावर तयार होणारे खत हे विनामुल्य स्वरुपात बचत गटांना देण्यात येणार आहे. त्यामुळे या खताच्या विक्रीतून महिला बचत गटांचे सक्षमीकरण होईल, आणि सेंद्रिय शेतीचे संवर्धन (Organic Farming Promotion) करण्यासही मदत होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी यावेळी दिली.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ऊंबर्डे येथील घनकचरा प्रकल्पावर महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मेसर्स विकास असोसिएट्स व त्रिवेणी असोसिएट्स यांचेमार्फत प्राप्त होणा-या सुमारे ४०० कोनोकार्पस या सदाहरित दाट प्रजातीच्या झाडांची लागवड ऊंबर्डे येथील घनकचरा प्रकल्पाच्या सभोवताली हरित भिंत (Green Wall) करण्यात येणार आहे. हरित भिंतीची देखभाल, दुरुस्ती उंबर्डे घनकचरा प्रकल्प विभागामार्फत केली जाणार आहे. या झाडांच्या लागवडीमुळे या घनकचरा प्रकल्पा भोवती हरित भिंतीचे आच्छादन तयार होवून, तेथील परिसरातील प्रदुषण कमी होवून पर्यावरणयुक्त वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे.
कल्याण- डोंबिवली नगरीत हरितक्रांती करण्यासाठी नागरीकांनी देखील सहकार्य करावे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांनी कल्याणमधील ऊंबर्डे येथील घनकचरा प्रकल्पात वृक्षारोपण करीत आपल्या नुतन वर्षाचा प्रारंभ करताना प्रतिपादन केले. ऊंबर्डे प्रकल्पात चांगल्या प्रकारच्या टेक्नोलॉजीचा वापर करुन, विस्तृत प्लॅन करून हा प्रकल्प चांगल्या प्रकारे राबविता येईल, यासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
डोंबिवली येथे कच-यासाठी १०० टिपीडी (१०० टन प्रतिदिन) प्लॅन्टचे बांधकाम सुरू आहे. तिथे आपण विन्ड्रो कंम्पोस्टींग करणार असून, त्याचे काम मार्च अखेरीस संपेल आणि डोंबिवलीतील कच-याची विल्हेवाट स्थानिक पातळीवर लावता येवू शकेल अशी माहिती पालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांनी दिली. यावेळी महापालिकेचे स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँन्ड ॲम्बेसिडर डॉ.प्रशांत पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, माजी स्थानिक नगरसेवक जयवंत भोईर, कार्यकारी अभियंता अनंत मादगुंडी, घन:श्याम नवांगुळ, ब, जे, फ, आय प्रभागाचे सहायक आयुक्त तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.