आमदार हितेंद्र ठाकूर आपल्या मतावर ठाम!
विरार (सुहास जाधव) : बहुजन विकास आघाडीचे पालघर लोकसभेचे उमेदवार राजेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर पालघर येथे आले होते. त्यावेळी पत्रकाराशी बोलतांना त्यांनी वाढवण बंदराबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी बविआ हा एकमेव पक्ष आहे ज्याने वाढवण बंदराला विरोध केला आणि करत राहील असे स्पष्ट केले.
उमेदवारीचा अर्ज राजेश पाटील यांनी पहिल्याच दिवशी भरला होता. दुसरा अर्ज असावा काही अर्जात चूक झाली तर त्या दृष्टीने सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पाटील यांनी पुन्हा अर्ज दाखल केला. आजची रॅली ही विजयावर शिक्कामोर्तब करणारी रॅली आहे, असेही ठाकूर यांनी यावेळी सांगितले. गावितांचे तिकीट कापण्यात आले. या विषयावर ठाकूर यांना छेडले असता त्यांनी गावितांचे तिकीट कापण्यास राजेश पाटील कारणीभूत आहेत. कारण काही लोकांचे सर्वे वारंवार चालू असतात; त्यात राजेश पाटील यांच्यासमोर कोणाचा टिकाव लागणार नाही. हे माहिती झाल्यामुळे त्यांचे तिकीट कट झाले. त्यांचे कर्तृत्व तुम्हाला माहीत आहे. त्याच्यावर मी काही बोलणार नाही, असा टोलाही ठाकूर यांनी गावितांना लगावला.
वाढवण बंदर हा झाईपासून थेट उत्तनपर्यंतच्या आपल्या मच्छीमारांच्या पोटावर पाय आणणारा प्रकल्प आहे. वाढवण बंदरासंदर्भात पालकमंत्र्यांनी बैठक घेतली होती; त्या वेळी जेएनपीटीचे एमडी सेठी म्हणून आले होते. त्यावेळी त्या बैठकीत खासदार होते, विधानसभेचे व विधान परिषदेचे आमदार असताना होते. त्यावेळी बविआ हा एकमेव पक्ष होता; ज्याने वाढवण बंदर नको म्हणून त्या बैठकीत सांगितले होते. वाढवणला विरोध करणारा बहुजन विकास आघाडी हा एकमेव पक्ष होता. हा विरोध आधी ही होता. आजही आहे व पुढेही राहील, असे ठाम मत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकारांशी पालघर येथे बोलताना केले.
जिल्ह्याचे पहिले खासदार बळीराम जाधव यांनी उपनगरीय लोकल सेवेला हिरवा झेंडा दाखवला. पालघरच्या समोर असलेल्या बॉम्बे हाय येथून आपल्याला गॅस मिळावा हा आग्रह धरला. आज अर्ध्या जिल्ह्यात पाईपद्वारे गॅस पोहचला आहे. उर्वरित जिल्ह्यात लवकरच गॅस येणार आहे. त्याच बरोबरीने औद्योगिक क्षेत्रात गॅस कसा मिळेल; जेणेकरून कारखान्यांची संख्या आपल्याकडे वाढेल व त्यामुळे रोजगार निर्माण होतील, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
बळीराम जाधव यांच्या कारकीर्दीत डहाणू-नाशिक रेल्वेचा सर्वे झाला होता. त्यानंतर त्याबाबत कोणीही लक्ष दिले नाही; त्या कामाला गती देण्याचे कामही आम्ही करणार आहोत, असेही ठाकूर यांनी यावेळी सांगितले.


