ठाणे : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला. मुंबईपाठोपाठ ठाणे महापालिकेने देखील ०५ टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पाणीकपात ठाण्यातील काही भागात सुरू झाली असून बुधवार ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात विविध स्रोतांमधून एकूण ५९० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यापैकी, ८५ एमएलडी पाणीपुरवठा हा मुबंई महापालिकेकडून केला जातो. या पाणी कपातीचा फटका ठाण्यातील नौपाडा, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथ नगर, नामदेव वाडी, साईनाथ नगर, रामचंद्र नगर १. किसन नगर नं १, किसन नगर नं २, शिवाजी नगर, पडवळ नगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्ती नगर, करवालो नगर, अंबिका नगर, ज्ञानेश्वर नगर, जय भवानी नगर, काजुवाडी, जिजामाता नगर, बाळकुम पाडा नं १, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, मानपाडा (नळपाडा), कोपरी धोबीघाट, गावदेवी (लुईसवाडी) जलकुंभ, टेकडी बंगला जलकुंभ, भटवाडी, इंदिरानगर, आनंद नगर, गांधी नगर, कोपरी, कन्हैया नगर या परिसराला बसणार आहे. वरील सर्व भागात पाच टक्के पाणीकपात लागू झाली असून पाच जूननंतर १० टक्के पाणी कपात केली जाणार आहे.
दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढत असताना ठाणे महापालिकेने पाणीकपात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आधीच हे काम ते कामामुळे पाणीपुरवठा दोनदोन दिवस बंद केला जातो. त्यात या पाणीकपातीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि त्याचा काटकसरीने वापर करून ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.