वरसोली बीच येथे निर्मल गणेशोत्सव साजरा




अनेक सामाजिक संस्थांनी एकत्रित येत राबविला एक अनोखा उपक्रम

अलिबाग (धनंजय कवठेकर) : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भारत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या सूचनेचे पालन करीत अलिबाग विभागातील श्री सदस्य , माणुसकी प्रतिष्ठान, जनशिक्षण संस्थान, निसर्ग सुंदर थळ संस्था, तेजस्विनी फाऊंडेशन, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था, ग्रुप ग्रामपंचायत वरसोली कर्मचारी, अशा विविध सामाजिक संस्थांनी एकत्रित येत निर्मल गणेशोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने निर्माल्य संकलनाचा उपक्रम यशस्वीरित्या वरसोली बीच या ठिकाणी पार पाडला.




 निर्माल्याचे विसर्जन समुद्रात किंवा तलावात करून जलचर प्राण्यांना धोका पोहोचतो व पाण्याचे प्रदूषण होते हे टाळण्यासाठी सदरील उपक्रम राबवून त्यामाध्यमातून संकलन केलेला निर्माल्य एका ठिकाणी गोळा करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी डॉ. राजाराम हुलवान यांनी दिली. शासनाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करीत सदरील समाजोपायोगी उपक्रमात सर्व संस्था एकत्रित येत जनजागृती करून सामाजिक बांधिलकी जपत असल्याचे मत यावेळी जन शिक्षण संस्थान चेअरमन डॉ. नितीन गांधी यांनी व्यक्त केले. 




तर उपक्रम तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा लोकांमध्ये जनजागृती होवून सर्वजण निर्धार करतील की आपल्या घरातील गणेशोस्तव साजरा करताना जो निर्माल्य संकलित होतो त्याचा वापर आपल्याच परसबागेत करून त्याचा उपयोग झाडांसाठी खत तयार करण्याससाठी करू जेणेकरून पर्यावरणाचे रक्षण तर होईलच परंतु शासनाला पुन्हा असे उपक्रम आयोजित करण्याची वेळ येणार नाही असे मत तेजस्विनी फाऊंडेशन संस्थापिका जिविता पाटील यांनी व्यक्त केले. 



सदरील उपक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रुप ग्राम पंचायत वरसोली, श्री सदस्य, तेजस्विनी फाऊंडेशन सहसचिव राखी पाटील, सामाजिक कार्यकर्ते संदीप वाटवे माणुसकी सदस्य संदीप जोशी, भगवान जाधव आदींचे मोठे सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post