गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांचा जीवघेणा प्रवास



दिवा, (आरती मुळीक परब) : गणपती उत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात असते. त्यासाठी रेल्वे प्रशासन,  एसटी महामंडळ आणि स्थानिक नेते मंडळींमार्फत प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पर्याय उपलब्ध करून दिलेले असतात मात्र रेल्वे वाहतुकीला अधिक पसंती मिळत असल्यामुळे रेल्वे पकडण्यासाठी प्रवासी अनेक अडचणींवर मात करून गावी जाण्याचा प्रयत्न करत असतात. दिव्यातून सकाळी ७.१५ वाजता सुटणाऱ्या दिवा- चिपळूण गाडीला चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. ही पॅसेंजर गाडी असल्याने ही दिवा ते चिपळूणपर्यंत सर्व स्टेशन थांबत जाते. या गाडीच्या वाढत्या गर्दीमुळे सीट मिळण्यासाठी चाकरमानी गाडीच्या विरुध्द बाजूने गाडीत चढतात. असे विरुध्द बाजूने चढून ते स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. 


ही दिवा- चिपळूण रोजची गाडी नसल्याची माहिती इतर चाकरमान्यांना नव्हती. पण गणेत्सोसवाचे दिवस जवळ आल्याने दिवा- सावंतवाडी, दिवा- रत्नागिरी गाडी प्रमाणे या गाडीला ही गर्दी वाढू लागली आहे. ही गाडी खास गणपतीसाठी १ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती स्टेशन प्रबंधकांनी दिली आहे. 


या गाडीसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे वरील चाकरमानीही येतात. या गाडीची तिकिट माफक असून ही कोकणातील प्रत्येक स्टेशन थांबत असल्याने चाकरमान्यांचा या गाडीला कल वाढत आहेत. या दिवा- चिपळूण गाडीच्या वाढत्या गर्दीमुळे बसायला जागा मिळण्यासाठी चाकरमानी गाडी फलाटावर येत असतानाच विरुध्द दिशेने चढून आपला जीव धोक्यात घालत आहेत. या सकाळच्या गाडीमुळे नागरिक ही वेळेत कोकणातील आपल्या घरी पोहोचत आहेत. त्यामुळे ही गाडी नेहमी असायला हवी, अशी मागणीही  चाकरमानी करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post