"स्वच्छता ही सेवा" अभियानातंर्गत आयुक्तांचा नागरिकांशी थेट संवाद





कल्याण, (शंकर जाधव) : शासनाच्या निर्देशानुसार "स्वच्छता ही सेवा" या अभियानाचे आयोजन महापालिका क्षेत्रात २ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महापालिका परिक्षेत्रातील उद्यानांमध्ये महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी नागरिकांसोबत स्वच्छतेबाबत संवाद साधला. 

 बुधवारी हा स्वच्छता संवाद कल्याण (प.) येथील साई उद्यान येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी पालिका सदस्य रजनी मिरकुटे, महापालिका उपायुक्त प्रसाद बोरकर, मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधव, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, इतर अधिकारी वर्ग व अनेक नागरिक मोठ्य संख्येने उपस्थित होते.





याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. यावेळी पथनाट्याच्या माध्यमातून कचरा संकलन व कचरा विलगीकरण याबाबत उपस्थितांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्याप्रमाणे महापालिका क्षेत्रातील उद्यान विकसित करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.


आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी वेळात वेळ काढून सकाळच्या वेळी नागरिकांची थेट – भेट घेतल्यामुळे उपस्थित नागरिकांच्या वतीने माजी पालिका सदस्य रजनी रजकुटे यांनी आयुक्तांचे आभार मानले. स्वच्छता ही सेवा या अभियानात, या पंधरवड्यात महापालिकेच्या इतर उद्यानात देखील महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या नागरिकांसमवेत स्वच्छता संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.




Post a Comment

Previous Post Next Post