मिलेट व फळ महोत्सवात २५ लाखांची विक्री


 कृषी पणन मंडळाचा उपक्रम

  कोल्हापूर / शेखर धोंगडे :  कृषी पणन मंडळ, कोल्हापूर विभागाने दिनांक १ ते ५ मार्च रोजी मिलेट व फळ महोत्सवाचे व्ही. टी. पाटील सभागृहामध्ये आयोजन केले होते. या मिलेट महोत्सवामध्ये राज्यातील नऊ जिल्ह्यांमधून मिलेट उत्पादक व फळ उत्पादक शेतकरी आले होते. महोत्सवातील एकूण ४५ स्टॉलमध्ये विविध प्रकारच्या मिलेट उत्पादनांची व फळांची विक्री करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने ज्वारी १०० क्विंटल, नाचणी २०० क्विंटल, मिलेट्स ६०० क्विंटल, तसेच ५८० किलो स्ट्रॉबेरी, ६०० किलो अंजीर, ७० किलो गुजबेरी, ३५ किलो मध आणि १० क्विंटल द्राक्ष, एक्सपोर्ट क्वालिटीचे डाळिंब ४०० किलो विक्री झाली आहे. 


महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी महिलांसाठी मिलेटच्या पाककृतींची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी एकूण ३० महिलांनी सहभाग घेतला. पाककृतींचे पर्यवेक्षण करण्यासाठी प्रामुख्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मिलेट संशोधन केंद्राचे डॉक्टर योगेश बन, एस. जी. एम. महाविद्यालय कराड येथील फूड सायन्स विभागाच्या प्राध्यापक डॉ. अहिल्या वाघमोडे, वखार महामंडळ कोल्हापूरच्या तृप्ती कोळेकर तसेच सावंत ऑरगॅनिकच्या जिजामाता कृषी भूषण पुरस्कार प्राप्त पूजा सावंत यांनी पर्यवेक्षण केले. या पाककृती स्पर्धेमध्ये सर्वच सहभागीदार महिलांनी अतिशय उत्कृष्ट अशा पाककृती ठेवल्या होत्या. मिलेटची पौष्टिक थाळी ठेवलेल्या विद्या शिंदे यांचा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला तसेच मयुरी रानमाळे यांनी वरी भगर पासून क्रिस्पी बॉल्स तयार केलेले होते त्यास द्वितीय क्रमांक तर संजीवनी प्रभावळे यांनी भगरीची खीर ठेवलेली होती त्यास तृतीय क्रमांक मिळाला. त्याचप्रमाणे शिवानी बिक्कड यांनी नाचणीचे सूप शेवग्याच्या रसासह ठेवलेले होते त्यास उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. 


मागील वर्षी जिल्ह्यामध्ये मिळालेला प्रतिसाद विचारात घेता यावर्षी करवीरवासीयांनी मिलेट व फळ महोत्सवास प्रचंड प्रतिसाद दिलेला असून महोत्सवामध्ये २५ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. पाककृती स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. महेश कदम विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर विभाग यांच्या हस्ते मान्यवर विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी कदम यांनी विजेत्या महिलांचे अभिनंदन केले व तयार केलेल्या मिलेटच्या विविध पदार्थांचे कौतुक केले. 


कार्यक्रमास डॉ. अहिल्या वाघमोडे, सूर्यप्रभा भोसले, तृप्ती कोळेकर, पूजा सावंत, पी. डी. सावंत, कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, प्रतीक गोनुगडे, ओंकार माने, प्रसाद भुजबळ, अमृता जाधव, सुयोग टकले, संदेश पिसे, किरण जाधव, अनिल जाधव व बबनराव रानगे उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post