डोंबिवली \ शंकर जाधव : जाह्नवीज मल्टी फाऊंडेशनची शैक्षणिक भरारी आकाश झेप घेत आहे. गेली २५ वर्षे सातत्याने शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेचा रौप्य महोत्सव वर्ष सोहळा spmvar२३जून रोजी साजरा करण्यात आला.
जे एम एफ संस्थेचा रजत महोत्सव, जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळेचा अठरावा स्थापना दिवस तसेच जन गण मन विद्यामंदिर शाळेचा दहावा स्थापना दिवस व वंदे मातरम महाविद्यालया चा सत्रावा मोठ्या उत्साहात मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये साजरा करण्यात आला. रांगोळ्या, फुलांनी दिव्यांनी शाळा सजवली होती.
जे एम एफ संस्थेचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, व इतर पदाधिकारी यांनी सरस्वती पूजन व स्वागत करून सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली.संस्थेचे अष्टप्रधान मंडळ व संस्थापित सहकारी यांनी आपल्या भाषणात संस्थेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.गेली पंधरा ते पंचवीस वर्षे संस्थेशी जुळलेली नाळ ही खऱ्या अर्थाने कौटुंबिक सुखाची झालर आहे आणि हेच सर्वांचे भावनिक नाते आहे, असे सर्वांनीच आपल्या भाषणात नमूद केले.
रौप्य महोत्सव दिना निमित्त संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांच्या हस्ते सर्वांना चांदीच्या गणपतीची प्रतिमा भेट देण्यात आली.
सर्वस्व आणि सत्ता याचा मोह सर्वांनाच असतो.परंतु नशीबा बरोबरच प्रयत्नांची पराकाष्ठा करुन ती सत्ता उभी करणे म्हणजेच मिळालेल्या यशाची फळे चाखण्यासारखे आहे. २५ वर्षाचा प्रवास सोपा नव्हता, अथक परिश्रम, जिद्द, नकारात्मकतेला सकारात्मक रित्या बदलून केलेला प्रवास म्हणजेच आकाशाकडे झेपावणारी ही जे एम एफ संस्था होय, आणि त्या अंतर्गत सक्रिय असलेल्या शाळा आणि महाविद्यालये नागपूर (दावसा) मधील इंग्रजी शाळा म्हणजेच ही यशाची पोच पावती आहे, असे संस्थापक अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये असताना, दोन हजार साली केलेली कल्पना म्हणजे एक छोटास लावलेलं शिक्षणाचं रोपटे च म्हणावे लागेल, आणि ती कल्पना साकार होत असताना त्याचा वेल हळूहळू पसरत मुंबई सारख्या राजधानीत पसरला व त्याचा महाकाय असा गुरु शिष्यच नाते निर्माण करणारा वटवृक्ष तयार झाला.सोसाव्या लागणाऱ्या कष्टाचा विसर पडता येणार नाही पण त्यामुळेच अभिमानाने आणि गर्वाने आम्ही तुम्ही सांगू शकतो की, होय ही आमचीच जे एम एफ संस्था आहे.असे उद्गार सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी काढले.
संस्थापकानी लिहिलेल्या जन गण मन शाळेचे गाणे हजारो मुलांनी गाऊन संस्थेला ,शाळेला मानवंदना दिली, त्याच बरोबर नाटक, नृत्य, प्रदर्शित करून सर्वांनाच आनंद दिला.पंचवीस वर्षाच्या प्रवासाची चित्रफित दाखवण्यात आली. शाळेच्या प्रांगणात लावण्यासाठी रोपटे देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन लिरा आणि श्रुतिका यांनी केले तर स्वागतपर भाषण अद्वैत या विद्यार्थ्याने केले. केक कापून संस्थेचा रजत महोत्सव साजरा केला तर सर्व मुलांना आवडीच्या जेम्स गोळ्या चे पाकिट देण्यात आली.संगीत शिक्षिका श्रेया कुलकर्णी यांनी वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमांची सांगता केली.