अजय जेया यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचा संताप
पार्किंग व्यवस्थेच्या अभावावरून प्रशासनावर टीका
ठाणे : ठाण्यात वाहतूक शाखेकडून रस्त्यावरील वाहने उचलण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या टोईंग व्हॅन योजनेला नागरिकांचा तीव्र विरोध सुरू झाला आहे. तीन हात नाका येथील वाहतूक विभाग कार्यालयाबाहेर समाजसेवक अजय जेया यांच्या नेतृत्वाखाली आज शेकडो ठाणेकरांनी आंदोलन केले.
ठाण्यातील घोडबंदर रोड, नंदनवन, स्टेशन परिसर, पाचपाखाडी, कोरम Mall भाग, कासारवडवली, माजिवडा अशा अनेक ठिकाणी पुरेशी पार्किंग व्यवस्था नाही. नागरिक व दुकानदारांना वाहनं उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नसतानाही, वाहतूक पोलिसांकडून बिनधास्तपणे टोईंग करून दंड आकारण्यात येतो. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
"एकीकडे शहरात पार्किंगसाठी जागा नाही, दुसरीकडे नागरी सुविधांकडे दुर्लक्ष करून प्रशासन फक्त दंड वसूल करण्यात मशगुल आहे. टोईंगसारखी यंत्रणा म्हणजे केवळ उत्पन्नाचा स्रोत," असे अजय जेया यांनी स्पष्टपणे सांगितले.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले. मात्र, कोणतेही ठोस उत्तर दिले नाही. आंदोलकांनी वेळ दिला असून योग्य उत्तर न मिळाल्यास पुढील टप्प्यात उपोषण वा रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
या आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग होता. "शहरात मुलांना शाळा, वयोवृद्धांना दवाखान्यात नेण्यासाठी गाडी लावण्यास जागाच नाही. अशा वेळी टोईंग करणे म्हणजे अन्यायच!" अशी भावना महिला आंदोलकांनी व्यक्त केली.
ठाण्यातील अनेक राजकीय नेते ‘शहर सुशोभीकरण’ योजनेचे समर्थन करत टोईंगसारख्या उपायांना अप्रत्यक्ष पाठिंबा देत आहेत. मात्र, नागरिकांच्या मूलभूत अडचणींकडे दुर्लक्ष केल्यामुळे लोकप्रतिनिधींची प्रतिमा आणि विश्वास यावर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.