आरटीआय कार्यकर्ते नागेश पवार आक्रमक
दिवा \ आरती परब : दिवा शहरातील अनेक सरकारी रेशन दुकानांमध्ये ग्राहकांना रेशन कार्डच्या युनिटपेक्षा कमी रेशन दिले जात असल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सामाजिक कार्यकर्ते आणि आरटीआय कार्यकर्ते नागेश पवार यांनी या प्रकरणाचे गांभीर्य समजून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून ही बाब गांभीर्याने घेण्याची विनंती केली.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत, केंद्र सरकार दरमहा प्रति व्यक्ती ५ किलो धान्य मोफत देत आहे. परंतु ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरात आतापर्यंत धान्य वितरणात मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, असे नागेश पवार म्हणाले. दिव्यात ८ सरकारी रेशन दुकाने असून त्यातील काही दुकांनाविरोधात फेराफेरीची तक्रार नागरिकांकडून पवार यांच्याकडे आलेली आहे. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की जर कोणत्याही नागरिकाची काही तक्रार असेल तर त्यांनी त्यांच्या कार्डची छायाप्रत आणि लेखी तक्रार घेऊन भेटावे जेणेकरून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले जाईल.