विजयाची किंमत; बंगळुरुतील चेंगराचेंगरीच्या छायेत हरवलेले चेहरे


४ जून रोजी बंगळुरु शहरात आनंदाचे वादळ उसळले होते. कारण देखील तसच होतं, आरसीबीने तब्बल १७ वर्षांनंतर आयपीएलचे जेतेपद जिंकले होते, आणि त्या विजयाचे जल्लोषी स्वागत करण्यासाठी लाखो चाहते रस्त्यावर आले होते. उत्साहाने, झगमगत्या मोबाईल फ्लॅश लाइट्सनी आणि "ई सलाम आरसीबी"च्या घोषणांनी शहर दुमदुमून गेलं होतं. पण त्या गजरात, कुठे तरी एक दबलेला आर्त टाहो हरवून गेला. एक काळ आला, आणि विजयाच्या जल्लोषातच ११ जणांचा जीव घेऊन गेला.


बुधवारी बंगळुरू शहरात उत्सवाचा ज्वर उसळला होता. १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबीने अखेर आयपीएलचा विजयी चषक उचलला होता. संपूर्ण शहर उत्साहात होते. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये अन् त्याच्या आसपास लाल आणि काळ्या रंगांची प्रभा पसरली होती. हातात झेंडे, अंगात जर्सी, ओठांवर गाणं, आणि डोळ्यांत अभिमान झळकत होता. प्रत्येक चाहता आपल्या संघाच्या विजयात स्वतःला हरवून बसला होता. हे फक्त क्रिकेट नव्हतं, हे त्यांच्या भावनांचे, त्यांच्या आयुष्याच्या अपूर्णतेवर मिळालेल्या विजयाचे प्रतीक होते. 

मात्र, याच आनंदाच्या उन्मादात, काही जीव कायमचे हरवले. स्टेडियमबाहेर झालेल्या अनियंत्रित गर्दीच्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू झाला. तीसहून अधिक जण गंभीर जखमी झाले. आणि एका सुवर्ण क्षणाच्या पायथ्याशी, एका अनर्थाचे पायघडे घातले गेले. कोणी थांबलं नाही, कोणी ऐकलं नाही, गर्दी धावत राहिली. टाळ्यांचा आवाज वाढत गेला. पण त्या गोंगाटामध्ये, काही जिवांचे शेवटचे श्वास दडपले गेले. विजयाच्या जल्लोषात, मृत्यूचा टाहो हरवून गेला.



हा अपघात नव्हता. ही एक स्पष्ट व्यवस्थात्मक चूक होती. एखाद्या स्टेडियममध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतील, याचा अंदाज प्रशासनाला असायलाच हवा होता. पण तिथे ना पुरेशा सुरक्षा यंत्रणा होत्या, ना गर्दी नियंत्रणाचे शास्त्रीय नियोजन. स्टेडियममध्ये फक्त तिकीटधारकांना प्रवेश होता, पण मैदानाबाहेर लाखो लोक जमतील, हे गृहित धरले गेले नव्हतं. सोशल मीडियाच्या युगात, अशा मोठ्या विजयाचा जल्लोष सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होईल, हे अपेक्षित होतं. तरीही ना अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, ना रस्ते नियंत्रण, ना वैद्यकीय यंत्रणा सज्ज आणि त्यामुळे जे टळू शकलं असतं, ते घडलं.

ज्यांना आपण "बळी" म्हणतो, ते खरंतर कोरे आकडे नव्हते. त्या आकड्यांच्या मागे एकेक चेहरा होता. त्या चेहऱ्यांमागे एकेक कहाणी. एक १६ वर्षांचा मुलगा, ज्याने आरसीबीची जर्सी विकत घेण्यासाठी महिनाभर खिसे रिकामे ठेवले होते. एक २४ वर्षांची तरुणी, जी कॉलेजमधून सरळ स्टेडियमबाहेर आली होती. पहिल्यांदाच "लाईव्ह सेलिब्रेशन" अनुभवायला. एक बाप, ज्याने मुलीला आपल्या खांद्यावर घेऊन ती आरसीबीच्या जल्लोषात न्हालेली पाहावी, असा विचार केला होता. हे सगळे, त्या रात्री पुन्हा घरी पोहोचले नाहीत.

त्या रात्री, चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर, फुलांच्या माळा नव्हत्या, होत्या तर चप्पलांच्या रांगा, रक्ताचे थेंब आणि भेसूर शांतता. मृतदेहांच्या ओळी, आणि त्यांच्या अवतीभवती कोसळलेल्या नजरा, कुणी आपली आई शोधत होतं, कुणी बहीण, कुणी नुकतीच कॉलेजमध्ये गेलेली मैत्रीण, जी म्हणाली होती, "आरसीबी जिंकलं, आता आयुष्य बदलणार! पण आयुष्य बदललं. नव्याने सुरू होण्याऐवजी थांबलं, कायमचं.



राजकीय नेते एकमेकांवर बोट दाखवतात. उपमुख्यमंत्री म्हणाले, "आम्ही माफी मागतो." पण ही माफी, त्या पोराच्या आईला काय दिलासा देईल? ती आई, जिला आजही विश्वास बसत नाही की तिचे मूल फक्त क्रिकेटच्या विजयाने हरवले. पोलीस यंत्रणा म्हणते "गर्दी अनियंत्रित झाली." आयोजक म्हणतात स्टेडियमच्या बाहेरचं आमचं काम नव्हतं." बीसीसीआय शांत आहे. आणि या सगळ्या गोंधळात, त्या ११ मृतांच्या नावांचे उच्चारही हरवले.

खरं सांगायचं झालं, तर ही घटना कुणाच्याच एकट्याच्या चुकीमुळे घडलेली नाही. ही आपल्या सगळ्यांच्या दुर्लक्षाची फळ आहे. जेव्हा एखादी घटना "फक्त सेल्फी साठी" अनियंत्रित होते, तेव्हा आपण त्या गर्दीचा भाग होतो. जेव्हा प्रशासन "सांभाळू" म्हणत जबाबदारी टाळतं, तेव्हा आपण त्या यंत्रणेचा भाग असतो. आणि जेव्हा माध्यमं ट्रॉफीच्या उत्सवातच अडकून राहतात आणि मृतांच्या बातम्या पुसून टाकतात, तेव्हा आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून निष्क्रिय राहतो.

काही विजय असतात, जे इतिहासात कोरले जातात. आरसीबीचं हे यश तसं आहे. पण याच इतिहासाच्या दुसऱ्या पानावर, काही अश्रू कोरले जातात, जे विसरले गेले, ज्यांचा उल्लेखही होत नाही. 

एका आईने बातमीदाराला सांगितलेलं वाक्य मनात खोल घर करतं."माझ्या मुलाला जिंकल्याचं आनंदाश्रू पाहायचे होते. पण त्याआधी त्याच्या डोळ्यांत शेवटचे घाबरलेले अश्रू दाटले." आरसीबीने ट्रॉफी उचलली. पण त्या ट्रॉफीच्या सावलीत, काही चिमुकल्या हातांनी शेवटचा श्वास घेतला. विजयाच्या घोषणांमध्ये मिसळलेला मृत्यूचा आवाज आपण ऐकू शकतो का? कदाचित नाही. पण म्हणूनच आपल्याला ऐकण्याचा प्रयत्न करावा लागेल.कारण प्रत्येक विजयाच्या मागे एक किंमत मोजावी लागते आणि ती किंमत जर जीव असेल, तर तो विजय कितीही मोठा असला, तरी तो अपूर्णच.




Post a Comment

Previous Post Next Post