राज ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल
मुंबई : मुंब्रा–दिवा स्थानकादरम्यान घडलेल्या दुर्दैवी रेल्वे अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आणि काहींना प्राणही गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर आणि प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
राज ठाकरे म्हणाले, “आज मुंबईत जो रेल्वे अपघात झाला तो दुर्दैवी आहे. अशाच घटना रोज मुंबईत घडत आहेत. रोज प्रवासी जखमी होत आहेत आणि तरीही कोणाला काहीही देणं-घेणं नाही.”
स्वतंत्र मुंबई रेल्वे महामंडळाची गरज
मुंबईसारख्या प्रचंड लोकसंख्येच्या शहरात रेल्वे ही जीवनवाहिनी आहे. तरीदेखील, गेल्या कित्येक वर्षांपासून "मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे महामंडळ" स्थापन करण्याची मागणी सरकारकडे प्रलंबित आहे. “आम्हीही ही मागणी पूर्वी केली होती, पण एकाही सरकारने कधीही लक्ष दिलं नाही,” असे सांगून त्यांनी शासनाच्या उदासीनतेकडे बोट दाखवले.
शहर नियोजनाचा बोजवारा
“आज शहरांचं नियोजन पूर्णपणे विस्कटलं आहे. प्रचंड लोंढे शहरांमध्ये येत आहेत. त्यांच्यासाठी मोठे रस्ते, ब्रिज, मेट्रो यंत्रणा उभारली जाते, उंच इमारतींना परवानगी दिली जाते, पण पार्किंगचं, वाहतुकीचं किंवा आपत्कालीन सेवांचं कुठलेही नीटसं नियोजन केलेलं नाही,” अशी टीका त्यांनी केली.
ट्रॅफिक आणि गर्दीचा विस्फोट
“प्रत्येक शहरात ट्रॅफिकचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. नवनवीन रस्ते आणि मेट्रो बांधूनही परिस्थितीत फारसा फरक पडत नाही. कारण सरकार कोणत्याही गोष्टीचं दीर्घकालीन नियोजन करतच नाही. बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांवर, त्यांच्या व्यवस्थापनावर कोणीच विचार करत नाही.”
निवडणुकांवर केंद्रित शासनयंत्रणा
“आज सगळं लक्ष फक्त निवडणुका आणि प्रचार यावर केंद्रित आहे. राज ठाकरे-उद्धव ठाकरे युती होणार का, या प्रश्नाचं इतकं गाजावाजा होतंय; पण मुंबईतील प्रवासी कशा अवस्थेत प्रवास करतात, शहरं कशी दमछाक करत आहेत – हे प्रश्न कुठे आहेत?” असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला.
माध्यमांवरही सवाल
“माध्यमं हे गंभीर प्रश्न उपस्थित करणार आहेत का? सरकारकडे उत्तरं मागणार आहेत का? कोण कोणाशी युती करणार, कोण काय बोललं, या चर्चांपेक्षा जनतेच्या रोजच्या जगण्याचे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत,” असा घणाघात त्यांनी माध्यमांवर केला.
खासदार–मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांवर टीका
“मी स्वतः मुंबईत रेल्वेने अनेक वर्ष प्रवास केला आहे. पण आता स्टेशनवरची गर्दी पाहून धडकी भरते. हे खासदार, आमदार, मंत्री परदेशात जातात – पण तिथून काही शिकून येतात का?” असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
माणसाच्या जीवाला किंमत नाही
“परदेशात अशी घटना घडली असती, तर तेथील प्रशासन तात्काळ जबाबदारी स्वीकारून कठोर पावलं उचललं असतं. आपल्याकडे मात्र माणसाच्या जीवाला किंमतच नाही,” अशा शब्दांत त्यांनी व्यवस्थेवर ताशेरे ओढले.