निळजेतील भुयारी मार्ग लवकरच जनतेच्या सेवेत


नागरिकांच्या मागणीनंतर आमदार राजेश गोवर्धन मोरे यांची प्रत्यक्ष पाहणी

कल्याण : कल्याण ग्रामीण मतदारसंघातील निळजे येथे नागरिकांनी प्रलंबित असलेल्या भुयारी मार्गाच्या (सबवे) संदर्भात सातत्याने मागण्या करूनही अद्याप काम पूर्ण झाले नव्हते. नागरिकांनी मांडलेल्या या गंभीर प्रश्नाची दखल घेत आमदार राजेश गोवर्धन मोरे यांनी २३ जून  रोजी स्वतः निळजे येथे भेट देऊन स्थितीचा सविस्तर आढावा घेतला.


या दरम्यान, नागरिकांनी आमदार मोरे यांना त्यांच्या अडचणी थेट मांडल्या. त्यांचे म्हणणे होते की, रेल्वे प्रशासनाकडून यापूर्वीच हा भुयारी मार्ग वेळेत पूर्ण करून देण्याचे आश्वासन मिळाले होते, मात्र आजतागायत काम अपूर्ण असल्यामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि कामगार यांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात विशेषतः येथे पाणी साचण्याची समस्या निर्माण होते, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही हा मार्ग अपूर्ण असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आमदार मोरे यांनी प्रत्यक्ष स्थळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित रेल्वे विभागाच्या डीआरएम (डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर) यांच्याशी थेट संपर्क साधला आणि काम रखडण्यामागील कारणांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी कामाचा वेग वाढवून भुयारी मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.

रेल्वे प्रशासनाकडून आमदार मोरे यांना हे काम प्राधान्याने हाती घेऊन येत्या काही महिन्यांतच पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन मिळाले. कामात पारदर्शकता राखली जाईल आणि प्रगतीचा नियमित आढावा घेतला जाईल, अशी ग्वाहीही प्रशासनाने दिली.

आमदार राजेश गोवर्धन मोरे यांनी यावेळी बोलताना म्हटले की, “हा प्रश्न जुना आहे, पण यावेळी उत्तर मिळवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. नागरिकांचे हित सर्वोच्च आहे आणि हा मार्ग लवकरात लवकर वापरासाठी खुला करून नागरिकांना दिलासा देणे हे माझे कर्तव्य आहे.”

या भेटीदरम्यान परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक प्रतिनिधी तसेच रेल्वे प्रशासनाचे अधिकारीही उपस्थित होते. आमदारांनी केलेल्या या प्रत्यक्ष पाहणीमुळे निळजेतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.





Post a Comment

Previous Post Next Post