मतदानाबाबत दिवा परिसरात प्रतिज्ञा व प्रभात फेरीच्या माध्यमातून जनजागृती

 


दिवा \ आरती परब : मतदानाचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने तसेच लोकशाहीचा अधिकार प्रत्येक नागरिकाने बजावावा, या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक २७ व २८ येथे शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रभावी मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले.


ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात स्वीप उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात मतदानाबाबत जनजागृती मोहिम आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनानुसार स्वीप उपक्रमाच्या नोडल अधिकारी डॉ. मिताली संचेती यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.


दिवा स्टेशन (पूर्व) येथील एस. एम. जी विद्यालय येथे मतदान जनजागृती प्रतिज्ञा व प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभातफेरीत विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन “मतदान हा हक्क आणि कर्तव्य आहे”, “लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करूया” अशा घोषणा देत नागरिकांमध्ये जनजागृती केली.


या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक धादवे सर, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच स्वीप पथक प्रमुख सचिन विलास वायदंडे (पथक क्र. २७ व २८) यांच्या नेतृत्वाखाली मच्छिंद्र मुंडे, गिरीश शेलार (केंद्र समन्वयक – १५), शिवा सांगळे, निवृत्ती जाधव व स्वीप पथकातील सदस्य उपस्थित होते. या जनजागृती उपक्रमामुळे नागरिकांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक संदेश पोहोचला असून, आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post