रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पक्ष्यांच्या संरक्षणासाठी प्रथमच जिल्हास्तरीय पक्षी मित्र संमेलन हॉटेल कोहिनूर येथे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये यांनी केले.
लिमये यांनी पक्षांचा अधिवास वाचविणे आणि जंगलांचे पुनर्संचयन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले. “वनांमुळे पक्ष्यांचा अधिवास टिकतो; पक्षी बीज प्रसारक म्हणून जंगल वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. देवराईचे संवर्धन हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात मुख्य वनसंरक्षक संजय गांधी, जितेंद्र रामगावकर, प्रा. जी. गुरुप्रसाद, तुषार चव्हाण, किरण जगताप, रणजीत गायकवाड, गिरिजा देसाई, तसेच पक्षी निरीक्षक, संशोधक आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तुषार चव्हाण म्हणाले, “रत्नागिरीसारख्या पक्षी संपन्न जिल्ह्यात पक्षी संमेलनास सुरुवात झाली, हे कौतुकास्पद आहे. यामुळे पक्षी अधिवास संवर्धनास चालना मिळेल. भारतात १३०० पक्षी असून महाराष्ट्रात सुमारे ५०० पक्षी प्रजाती आढळतात.”
सदर संमेलनाच्या निमित्ताने ग्रेट इंडियन हॉर्नबिल (महाधनेश) पक्षाच्या चार प्रजाती रत्नागिरीमध्ये आढळल्या असल्यामुळे, पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेनुसार आणि जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या सहकार्याने महाधनेश पक्षाला जिल्ह्याच्या वन पर्यटनासाठी प्रमुख प्रजाती म्हणून घोषित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि वृक्षाला पाणी देऊन करण्यात आली. विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, राज्यभरातील पक्षी निरीक्षक, संशोधक आणि वन विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


