ठाणे महापालिकेवर भूमिपुत्रांचा आरोप
दिवा \ आरती परब : ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात ठाणे महापालिकेच्या कामांवरून स्थानिक भूमिपुत्र आणि प्रशासन यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. दिवा पूर्वेतील टर्निंगच्या वाईन शॉपजवळ गटार आणि रस्ते रुंदीकरणाच्या कामाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
स्थानिक भूमिपुत्रांचा आरोप आहे की, महापालिकेने त्यांच्या मालकीच्या जागेवर कोणताही मोबदला न देता गेल्या १८ ते २० वर्षांपासून विविध कामे केली आहेत. यामध्ये गटार साफसफाई, दुरुस्ती आणि रस्ते विस्तार यांचा समावेश आहे. साबे गाव आणि दिवा परिसरातील सुमारे १० ते १५ शेतकरी अद्यापही मोबदल्यापासून वंचित असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, संबंधित जागेवर काम सुरू करण्यासाठी महापालिकेकडून पोलीस बंदोबस्तात काम करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली होती.
स्थानिकांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी करत, योग्य मोबदला मिळाल्याशिवाय कामाला विरोध कायम ठेवण्याचा इशारा ही भूमिपुत्रांनी दिला आहे. या प्रकरणी ठाणे महापालिकेची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

