भारतीय स्वयंपाकघरात कोथिंबिरीला विशेष महत्त्व आहे. भाजी, आमटी, उसळ, चाट किंवा सलाड असो, कोथिंबिरीशिवाय पदार्थाची चव आणि सजावट अपूर्ण वाटते. बाजारातून वारंवार कोथिंबीर खरेदी करण्याऐवजी ती घरच्या घरी सहज पिकवता येते. अ व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के तसेच अँटिऑक्सिडंट्सचा ती चांगला स्रोत मानली जाते.
कोथिंबीर ही अशी भाजी आहे जी अगदी कमी जागेतही सहज वाढते. फक्त एक छोटी कुंडी, योग्य माती आणि थोडीशी काळजी घेतली तर काही आठवड्यांतच हिरवीगार कोथिंबीर तयार होते. विशेष म्हणजे एकदा लागवड केल्यानंतर तिची देखभालही फारशी करावी लागत नाही.
कोथिंबीर लावण्यासाठी लागणारे साहित्य
कोथिंबिरीचे बियाणे
मध्यम आकाराची कुंडी किंवा ग्रो बॅग
सेंद्रिय खतयुक्त माती
पाणी फवारण्यासाठी स्प्रे बॉटल
भरपूर सूर्यप्रकाश मिळणारी जागा
बियाणे तयार करण्याची योग्य पद्धत
कोथिंबिरीचे बी दोन भागांत विभागलेले असते. पेरणीपूर्वी बिया हलक्या हाताने चुरून दोन भाग कराव्यात. यामुळे बियांची उगवण जलद होते. बिया 8 ते 10 तास पाण्यात भिजत ठेवल्यास अंकुरण अधिक चांगले होते.
मातीची तयारी कशी करावी?
कोथिंबिरीसाठी भुसभुशीत आणि पाणी न साचणारी माती योग्य असते. बागेतील माती, शेणखत आणि कोकोपीट समप्रमाणात मिसळून कुंडी भरावी. यामुळे रोपांची वाढ चांगली होते.
पेरणीची पद्धत
तयार केलेल्या मातीत बिया हलक्या हाताने पसराव्यात. त्यावर मातीचा पातळ थर द्यावा आणि स्प्रेने पाणी शिंपडावे. बिया फार खोलवर पेरू नयेत.
पाणी आणि सूर्यप्रकाश
कोथिंबिरीला दररोज थोड्या प्रमाणात पाणी द्यावे. मात्र जास्त पाणी दिल्यास मुळे कुजू शकतात. दररोज 4 ते 5 तास सूर्यप्रकाश मिळाल्यास कोथिंबिरीची वाढ उत्तम होते.
खताचा वापर
दर 15 दिवसांनी सेंद्रिय खत किंवा कंपोस्ट टाकल्यास कोथिंबीर दाट आणि हिरवीगार वाढते. रासायनिक खतांचा वापर टाळणे अधिक चांगले.
कोथिंबीर कधी काढावी?
पेरणीनंतर साधारण 25 ते 35 दिवसांत कोथिंबीर कापणीसाठी तयार होते. गरजेनुसार पाने कापावीत. मुळासकट उपटण्याऐवजी वरचा भाग कापल्यास पुन्हा नवीन पाने येतात.
घरच्या घरी कोथिंबीर लावण्याचे फायदे
✔ ताजी आणि सेंद्रिय कोथिंबीर मिळते
✔ बाजारातील खर्च कमी होतो
✔ घराच्या बाल्कनीला हिरवागार लूक मिळतो
✔ रसायनमुक्त भाज्यांचा वापर करता येतो
✔ बागकामाचा आनंद मिळतो




