आग्र्यातील किल्ल्यात साजरी होणार शिवजयंती

 


आग्रा :  राज्यसह देशभरातील शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ३९३ व्या जयंती सोहळा आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आममध्ये रंगणार आहे.  सोहळ्यासाठी महाराष्ट्र सरकारने भारतीय पुरातत्त्व विभागाकडून परवानगी घेतली आहे. जयंती सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन आणि एएसआयने जय्यत तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करत सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

किल्ल्यातील दिवाण-ए-आममध्ये पडदा टाकण्यात आला होता. समोर 54 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म बांधण्यात आला. 18 फेब्रुवारीला आग्रा किल्ल्यावर रंगीत तालीम होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.15 वाजता होणार आहे. सायंकाळी 6.30 पासून कार्यक्रम सुरू होतील. जो रात्री ९ वाजेपर्यंत चालेल, या वेळी पोवाडा (महाराष्ट्रीय लोकनृत्य), पाळणा मराठी गीत (छत्रपती शिवाजी), महाराष्ट्रातील गीतांचे गायन, छत्रपती शिवाजी महाराजांवर ७० कलाकारांचे नाट्य सादरीकरण, राष्ट्रगीत सादरीकरण होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आग्र्यातील लाल किल्ल्यात 1666 मध्ये म्हणजे साडे तीनशेपेक्षा जास्त वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे आराध्य़ दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा औरंगजेबाने भेटण्यास नकार देत अपमान केला होता. मात्र याच लाल किल्ल्यातील दिवान ए आम सभागृहात यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात भाग्य तमाम शिवप्रेमींना मिळतयं, ही सगळ्यांसाठी आनंदाची, अभिमानाची आणि भाग्याची गोष्ट आहे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सांस्कृतिक विभागाचे मंत्री जी किशन रेड्डी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भारतीय पुरातत्व विभागाला धन्यवाद देत मनापासून त्यांचे आभार व्यक्त केले.




Post a Comment

Previous Post Next Post