मसाल्याच्या किंमती वाढल्याने महिला वर्ग चिंतेत
नवी मुंबई: उन्हाळा सुरू झाल्यामुळे आता गृहिणींची मसाले तयार करण्याची धडपड सुरू झाली आहे. मात्र मिरचीच्या दरात वाढ झाल्याने मसाला तयार होण्याआधीच तिखट झाला आहे.बाजारात मसाल्यासाठी मिरच्यांची मागणी वाढली आहे. मात्र यावर्षी मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात मसाल्यासाठी लागणाऱ्या लाल मिरच्या कडाडल्या आहेत.
मसाल्याचा रंग खुलवणारी काश्मिरी मिरची आणि मसाल्याची चव वाढवणारी – संकेश्वरी मिरची तर बाजारात अगदी कमी प्रमाणात उपलब्ध आहे. परिणामी बाजारातील मिरच्यांचे दर ३० ते ४० टक्कानी वधारले आहेत. त्यामुळे यावर्षी साठवणुकीचा मसाला करताना महिलांना आपला हात आखडता घ्यावा लागणार आहे. सध्या बाजारात १५ दिवसाला अवघ्या १ ते २ गाड्या मिरची बाजारात येत असल्याची माहिती मिरची व्यापाऱ्यांनी दिली आहे.
संपूर्ण हंगामात बाजारात मसाल्याच्या ४०० ते ५०० पोती मिरच्या बाजारात येतात. एका पोत्यात ४० ते ५० किलो मिरची असते. मसाल्यासाठी मुख्यतः बेडगी, तेजा, संकेश्वरी, काश्मिरी या मिरच्या लागतात. त्यांच्याबरोबर अख्खा गरम मसालाही लागतो. या अख्ख्या गरम मसाल्याचे दर स्थिर आहेत. मात्र मसाल्यात मुख्य घटक मिरची हाच असतो. तीच महागल्याने मसाला कसा बनवणार हा प्रश्न महिलांना भेडसावत आहे.