शासकीय रुग्णालय, पोलीस स्टेशन, अग्निशामक केंद्र, माध्यमिक शाळा, प्रभाग समिती व इतर शासकीय कार्यालयांचे स्वप्न पूर्ण होणार
दिवा शहरातील आरक्षित भूखंडावरील शेतकऱ्यांना मोबदला देऊन भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार - जिल्हाधिकारी आणि आयुक्तांचे आश्वासन
दिवा/ आरती मुळीक परब : - दिव्यात शासकीय रुग्णालय, पोलीस स्टेशन, अग्निशामक केंद्र, माध्यमिक शाळा, प्रभाग समिती कार्यालय व इतर शासकीय कार्यालये नसल्याने दिवेकरांची बरीच पायपीट होते. हे होणारे हाल लक्षात घेता उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली दिवा शहरातील आरक्षित भूखंडावरील स्थानिक शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देऊन भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी दिवा शहरातील शिष्टमंडळाने काल जिल्हाधिकारी व ठामपा आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन दिले.
दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील सेक्टर - १० मौजे आगासन दिवा शहरातील येथील IRWO आरक्षण क्रमांक- १, क्षेत्र १३.८७ हेक्टर म्हणजेच साडे चवतीस एकर भूखंडावर दिवावासीयांसाठी सुविधांचे जाळे उभारण्यास शासनाकडून संमती मिळाली आहे. सदर आरक्षित भूखंडावर अद्यावत शासकीय रुग्णालय बांधण्यासाठी जागा आरक्षित करण्यात आली असून सदर जागेवर रुग्णालय उभारण्याच्या कामाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे.
दिवावासीयांचे आरोग्य लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतील वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना दिवा शहरात कार्यरत आहे. सदर दवाखान्यात रुग्णाची तपासणी, चाचण्या व औषधं मोफत असल्यामुळे त्याला दिवावासीयांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. परंतु मोठ्या उपचारासाठी रुग्णांना दिवा शहराच्या बाहेर कल्याण, डोंबीवली, ठाणे आणि मुंबईला जावे लागत असल्याने दिवा शहरासाठी आवश्यक असणाऱ्या अद्ययावत शासकीय रुग्णालयाच्या कामाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे. दिव्यातील आगासन गावात पालिकेचे शासकीय रुग्णालय, पोलीस स्टेशन, अग्निशामक केंद्र, माध्यमिक शाळा, प्रभाग समिती कार्यालय व इतर शासकीय कार्यालये अशी एकूण सहा मोठे प्रोजेक्ट होणार आहेत. पण त्यातील शासकीय रुग्णालयासाठी प्रथम प्राधान्य देऊन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना शहर प्रमुख, मा.उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या प्रयत्नांमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्यांदाच रोख रक्कमेच्या स्वरूपात मोबदला देण्यात यावा असा ठराव महासभेत करण्यात आला. त्यानुसार आरक्षित भूखंडावरील शेतकऱ्यांना मोबदला मिळावा व भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करावी यासाठी उपमहापौर मढवी यांच्या नेतृत्वाखाली दिव्यातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व ठामपा आयुक्तांची भेट घेतली. जिल्हाधिकारी आणि ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी लवकरच स्थानिक शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देऊन भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी नगरसेवक शैलेश पाटील, अमर पाटील, दिपक जाधव, नगरसेविका सुनीता मुंडे, दिपाली भगत, दर्शना म्हात्रे, उपशहर प्रमुख ॲड.आदेश भगत, युवासेना युवती प्रमुख साक्षी मढवी, विभागप्रमुख चरणदास म्हात्रे, विनोद मढवी, शशिकांत पाटील, भालचंद्र भगत, निलेश पाटील, उपविभाग प्रमुख समीर पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते
Tags
महाराष्ट्र

