खोणी गावात महावितरणच्या भरारी पथकावर हल्ला

कल्याण/ शंकर जाधव : वीजचोरी शोध मोहिमेवरील महावितरणच्या भरारी पथकावर डोंबिवली नजिकच्या खोणीगाव (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे बुधवारी (२४ मे) दुपारी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पथकातील 5 जणांना व 1 मानपाडा पोलीसाला मारहाण, शिवीगाळ व धमकावले. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान व इतर कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. दोघा हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींच्या अटकेसाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत.
महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाची तीन पथके कल्याण पश्चिम उपविभाग एक अंतर्गत खोणीगाव परिसरात वीजचोरीच्या विशेष शोध मोहिमेवर होती. यातील उप कार्यकारी अभियंता राजेश म्हसणे यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने खोनीगाव येथील ठोंबरे यांच्या दुमजली बंगल्यातील वीज पुरवठ्याची तपासणी केली. यात दोन मीटर बायपास करून थेट वीजचोरी सुरू असल्याचे तर एका मीटरमध्ये फेरफार करून मीटरचा वेग कमी केल्याचे आढळले. त्यानुसार संबधित वीज मिटर जप्त करून पथक इतरत्र निघाले असता ठोंबरे याने जमाव जमा करून पथकाच्या वाहनावर दगडफेक केली. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचारी एस. एम. वाघमारे यांना काठीने मारहाण केली. पथकातील इतर दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह, एक वाहनचालक, महावितरणचे चार अधिकारी-कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ व गावात परत आल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली. दगडफेक करून वाहनाचे नुकसान करत जप्त केलेले मीटरही हिसकावून नेले. आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post