जलसाक्षरतेसाठी महाजलदूत नेमणार

 

जलयुक्त शिवारची कामे गतीने करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई, दि. 24 : पावसाळा जवळ आला असल्यामुळे जलयुक्त शिवार अभियान २.० ची कामे गतीने करावीत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर या गावांमध्ये जलसाक्षरता वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. जलसाक्षरता वाढावी यासाठी ‘महाजलदूत’ नेमण्यात येणार आहेत. याबाबत मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जलयुक्त शिवार अभियान २.०, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री  फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जलयुक्त शिवार योजना २.० मध्ये अनेक बदल करून ही योजना परिपूर्ण बनविण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या योजनेत जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कामे पूर्ण करण्याबाबत यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेतली गेली आहे. आज पाण्यासंदर्भात काम करण्यासाठी अनेक खाजगी संस्था पुढे येत आहेत त्यांच्या मदतीने व लोकांच्या सहभागाने या योजनेला चांगली गती मिळत आहे. कोणतेही काम करताना लोकांना ते आपले वाटणे महत्त्वाचे असते त्यामुळे या योजनेत लोकसहभाग वाढविणे गरजेचे असते. प्रशासन आणि जनतेचा संवाद वाढला की कामाचे यश नक्की असते. जलयुक्त शिवारची कामे पूर्ण झाली की काम संपणार नाही तर लोकांमध्ये पाण्याचा वापर जबाबदारीने करण्याबाबतही योग्य साक्षरता असणे गरजेचे आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जलपरिपूर्ण गाव तयार करणे गरजेचे आहे. जलयुक्त शिवार योजना २.० मध्ये कृषी विभागाचा सहभाग वाढावा, यासाठी नवीन सूचना देण्यात येतील. या कामांसाठी लागणार निधी जिल्हा नियोजन समितीमधून देखील घेता येईल, याबाबतच्या मंजुरी देण्यात येतील, मात्र ही कामे गतीने करावीत. गावातील सर्व कामे पूर्ण होतील, याबाबत खबरदारी घ्यावी, असे उपमुख्यमंत्री यांनी सूचित केले. यावेळी मृद व जलसंधारणचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यासह मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post