कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन
डोंबिवली / शंकर जाधव : आगामी विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीण मधून शिवसेनेचाच उमेदवार निवडून येणार अशा प्रतिक्रिया शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मीडियाला दिल्या होत्या. त्याबाबतीत कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोणीही टीआरपी साठी धडपडू नये, भाजप शिवसेना युतीतील निर्णय फक्त वरिष्ठ पातळीवर होत असतात असा तिखट सल्ला दिला. मात्र या चव्हाणांच्या वडीलकीच्या तिखट सल्ल्यामुळे पुन्हा डोंबिवलीत राजकीय प्रतिउत्तरांची चढाओढ सुरू होईल अशी चर्चा आहे.
यावेळीकल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक साई शेलार, डोंबिवली शहर उपाध्यक्ष राजू शेख, मितेश पेणकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनसेवक म्हणून काम करीत आहेत त्याला आता 9 वर्षे पूर्ण झाली. त्या 9 वर्षांमध्ये जनसामान्य, गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी आदींसाठी अनेक योजना नरेंद्र मोदींच्या सरकार माध्यमातून करण्यात आल्या. या सर्व योजनांची माहिती सामान्य माणसांपर्यंत सहजपणे पोहचविण्याचं काम नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांनी केले आहे. तरीही प्रत्येक लाभार्थी आणि जनसामान्यांपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी "मोदी @9" कार्यक्रमच्या माध्यमातून सर्व योजना सामान्यांपर्यंत पोहचवा असं केंद्रीय नेतृत्वाने सांगितले आहे. त्याचाच भाग म्हणून कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण हे इंदिरानगर परिसरातील नागरिकांशी संपर्क साधून योजनांची माहिती दिली. त्यांच्या या उपक्रमाला तेथील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.